कांद्याला ३०० रुपये अनुदान...

शिंदे- फडणवीस सरकार बळीराजाच्या सर्व समस्या सोडवणार: आ. सुभाष देशमुख
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने २०० रुपये प्रति क्विंटल सानुग्रह अनुदान देण्याची शिफारस केलेली असताना राज्य सरकारने ३०० रुपये प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर केल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यास मोठा दिलासा मिळाला आहे. शिंदे-फडणवीस सरकार हे बळीराजाच्या पाठीशी उभे असणारे सरकार असल्याचे सिद्ध झाले आहे, हे सरकार निश्चितच बळीराजाच्या सर्व समस्या सोडवणार अशा शब्दांत आ. सुभाष देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या वतीने राज्य सरकारचे आभार मानले आहेत.
सोमवारी विधिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय जाहीर केला. कांद्याचे भाव पडल्याने निराश झालेल्या शेतकऱ्यास या निर्णयामुळे मोठा आधार मिळाला आहे. बाजारात खरीप हंगामातील लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर आहे. देशात कांद्याचे उत्पादन वाढल्याने पुरवठ्याच्या प्रमाणात मागणी कमी झाल्याने कांद्याचे दर घसरले आहेत. कांदा हे नाशवंत पीक असल्याने त्यास किमान आधारभूत किंमत लागू करता येत नाही. तथापि कांद्याला मिळणारा भाव हा शेतकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील व जिव्हाळ्याचा विषय असून राज्यातील अनेक शेतकरी कुटुंबांचे आर्थिक गणित त्यावर अवलंबून असल्याने या कुटुंबांना न्याय देण्याची जबाबदारी स्वीकारून शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेला मोठा निर्णय आहे, असे आ. देशमुख म्हणाले. बळीराजाच्या सर्व समस्या हे सरकारच सोडवेल असा विश्वास शेतकऱ्यांमध्येही निर्माण झाला आहे.
नाकर्त्या ठाकरे सरकारच्या अडीच वर्षांच्या सर्वात भ्रष्ट सत्ताकाळात राज्यातील शेतकऱ्यांसमोर समस्यांचा डोंगर उभा होता. नैसर्गिक आपत्ती, नापिकीसारख्या समस्यांनी ग्रस्त झालेल्या शेतकऱ्याची केवळ पोकळ आश्वासनांवर बोळवण करणारे तेव्हाचे सत्ताधारी आज शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचा केवळ कांगावा करीत आहेत. आता आपले प्रश्न मार्गी लागतील या खात्रीमुळेच शेतकरी शिंदे – फडणवीस सरकारकडे आशेने पाहात आहे, असा टोलाही आ. देशमुख यांनी लगावला. विरोधकांनी कांद्याच्या मुद्द्यावरून केवळ आणि केवळ राजकारण चालविले असून अशा स्वार्थी राजकारणात बळीराजाची होरपळ होऊ देऊ नका, असे आवाहनही त्यांनी विरोधकांना केले.
0 Comments