श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा ४१ वा गळीत हंगाम शुभारंभ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 19, 2022

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा ४१ वा गळीत हंगाम शुभारंभ

 श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा ४१ वा गळीत हंगाम शुभारंभ


पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याचा ४१ वा गळीत हंगाम शुभारंभ दिनांक १६.१०.२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता या शुभमुहूर्तावर  विरोधी पक्ष नेते आ. प्रविणजी दरेकर, आ. शहाजी (बापू) पाटील, शेखर गायकवाड साखर आयुक्त, पुणे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते व कारखान्याचे चेअरमन  अभिजीत पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. तसेच कलश पुजन कारखान्याचे संचालक दत्तात्रय विश्वनाथ नरसाळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.सदर प्रसंगी आ.प्रविण दरेकर यांनी आपले भाषणात बोलताना म्हणाले की, सहकारी साखर कारखान्याचे सभासद हे मालक आहेत. हा कारखाना वाचविणेसाठी चेअरमन अभिजीत पाटील यांना मुंबई जिल्हा मध्य. सह. बँकेकडून आर्थिक मदत केली. एखादा कार्यकर्ता जेंव्हा चांगले काम करतो तेंव्हा तो कोणत्याही पक्षाचा असला, तरी त्याच्या पाठीमागे सर्वांनी उभा राहिले पाहिजे. शेतकऱ्यांना एफ. आर. पी.साठी आंदोलने करूनही एफ. आर. पी. ची रक्कम कारखान्याकडून मिळत नाही, त्यासाठी शेखर गायकवाड साहेब यांच्या सारखे सक्षम अधिकारी असतील तरच शेतकऱ्यांना वेळेत एफ.आर.पी. मिळेल. अभिजीत पाटील यांना कारखान्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले. हा कारखाना गत सिझन बंद अवस्थेत असूनदेखील ३ महिन्यात कारखाना चालू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केलेबद्दल चेअरमन अभिजीत पाटील यांचे कौतुक केले.

सदर प्रसंगी बोलताना आ.शहाजी (बापू) पाटील म्हणाले की, या कारखान्यासाठी आ.दरेकर साहेब यांनी आर्थिक मदत केली. जुन्या आठवणींना उजाळा देत असतांना संस्थापक चेअरमन कै. औदुंबर आण्णा पाटील यांचे वैचारिक वारसदार अभिजीत पाटील असल्याचे सांगितले. गत वर्षी बंद अवस्थेत असलेला श्री विठ्ठल कारखाना चालू करून चेअरमन  अभिजीत पाटील यांनी शेतकरी सभासदांचा खऱ्या अर्थाने दुवा घेतल्याचे म्हणाले. अशा तडफदार तरूण कार्यकर्त्याला पाठबळ देणेसाठी अभिजीत पाटील यांच्या सारख्या कार्यकर्त्यास विधानपरिषदेवर पाठविण्याचे काम आ.प्रविण दरेकर यांनी करावे असे सांगितले.

तसेच महाराष्ट्र राज्यात सर्वांत जास्त साखर उत्पादन करणारा चेअरमन म्हणून पुढील काळात  अभिजीत पाटील असतील असे म्हणाले. सदर प्रसंगी बोलताना साखर आयुक्त, शेखर गायकवाड म्हणाले की, आपल्या संपूर्ण भारत देशातून ११२ लाख मे. टन साखर निर्यात केली असून, यापैकी महाराष्ट्र राज्यातून ७० लाख मे. टन साखर परदेशामध्ये निर्यात केलेली आहे. यावर्षीही विक्रमी

साखरेचे उत्पादन होणार आहे. तसेच ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांनी कारखान्याच्या अडचणीच्या काळात काही रक्कम ठेवी स्वरूपात ठेवल्यास कारखाना आर्थिक अडचणीतून मार्ग काढून सुस्थितीत येईल. असा प्रयोग महाराष्ट्रातील बऱ्याच सहकारी साखर कारखान्यांनी केल्यामुळे सदरचे सहकारी कारखाने बँकांकडे कर्जासाठी न गेल्यामुळे कारखान्यांचा कर्जाचा डोंगर कमी झाल्याचे सांगितले. यावर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये साखर कारखान्यातील ऊस तोडणीसाठी ४० टक्के सबसिडीने हार्वेस्टर मशिन खरेदी करणेसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव दाखल केलेला आहे. महाराष्ट्रातील सर्व कारखान्यांचे गाळप हे १५ एप्रिल पर्यंत पूर्ण होईल असे आमचे कार्यालयाकडून नियोजन करण्यात आलेले आहे. जे कारखाने वेळेत ऊस नेतील व ऊस बिल थकविणार नाहीत,अशा कारखान्यांनाच ऊस देण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले. आपल्या कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वी होणेसाठी शुभेच्छा

देऊन, आता पंढरपूर तालुक्याला ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील अशा अपेक्षा व्यक्त केल्या. यावेळी कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील म्हणाले की, गेल्या सिझनला कारखाना चालू झाला नाही, यावर्षी कारखाना पुर्ण क्षमतेने चालणार असून त्यासाठी लागणारी तोडणी वाहतूक यंत्रणा सज्ज असून गळीतासाठी ३६,३१६ एकर ऊसाची नोंद झालेली आहे. त्यापासून अंदाजे १२ लाख मे. टनाचे गाळपाचे उद्दीष्ट आहे. २ ते ३ दिवसात तोडणी वाहतूकीचे सन २०२०-२१ ची थकीत रक्कम देणार असल्याचे त्यांनी सांगीतले. कारखान्यान्याचे आर्थिक नियोजन करून कर्जाची वेळेत परतफेड करणार आहे. सर्व सभासद शेतकऱ्यांनी आपण पिकविलेला संपूर्ण ऊस कारखान्यास गळीतास देऊन गळीत हंगाम यशस्वी पार पाडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहनही अभिजीत पाटील यांनी केले. आपला कारखाना चालू करणेसाठी आ.प्रविणजी दरेकर यांनी आर्थिक मदत केल्याबद्दल त्यांचे संचालक मंडळाच्या व सभासदांच्या वतीने आभार व्यक्त केले. तसेच पंढरपूर तालुक्याचे गतवैभव प्राप्त करणेसाठी हा कारखाना चालू करण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल मी सर्व सभासदांचे आभार

मानतो. तसेच तरुण शेतकरी युवकांना सभासद करून घेणेसाठी नवीन १५,००० शेअर्सची विक्री करणार असल्याचे सांगितले. कारखान्याचा मागील सिझन बंद असल्यामुळे साखर उपलब्ध नसतांनाही बाहेरून विकत घेऊन सभासदांना दिपावली गोड करण्यासाठी सवलतीच्या दरामध्ये साखर वाटप चालू केले आहे. कारखान्यास उभारी देण्यासाठी सभासदांनी आत्तापर्यंत अडीच कोटींच्या ठेवी दिल्या असून सभासदांनी आणखी ठेवी देण्याचे आवाहन केले. ठेवीदारास कारखान्याकडून १० टक्के द.सा.द.शे.दराने व्याज दिले जाईल व ज्यांना ठेव परत पाहिजे, त्यांनी ३ दिवस अगोदर कारखान्यास कळवावे, त्यांना त्यांची ठेव परत केली जाईल असे सांगितले.स्वागत व प्रास्ताविक कारखान्याचे कार्यलक्षी संचालक तुकाराम मस्के सर यांनी केले, तर कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.या कार्यक्रमासाठी कारखान्याचे व्हाईस चेअरमन  प्रेमलता रोंगे, संचालक सर्वश्री संभाजी भोसले, कालिदास पाटील, दिनकर चव्हाण, सुरेश भुसे, बाळासाहेब हाके, धनंजय काळे, साहेबराव नागणे, कालिदास साळुंखे, सचिन वाघाटे, जनक भोसले,प्रविण कोळेकर, नवनाथ नाईकनवरे, सिताराम गवळी, अशोक जाधव, सिध्देश्वर बंडगर,समाधान काळे, कलावती महादेव खटके,सविता विठ्ठल रणदिवे, तज्ञ संचालक सर्वश्री दशरथ जाधव,अशोक तोंडले, तसेच एम. एस. सी. बँक प्रतिनिधी सी. एस. पाटील, धाराशिव साखर कारखान्याचे एम. डी. अमर पाटील, मुंबई बँकेचे संचालक विठ्ठलराव भोसले, साखर उपआयुक्त संजयकुमार भोसले तसेच दामाजी कारखान्याचे माजी चेअरमन व सिताराम कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव काळुंगे सर व राजाराम सावंत,कारखान्याचे माजी संचालक, पंढरपूर व मंगळवेढा नगरपालिकेचे आजी-माजी नगरसेवक तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग, कार्यकर्ते, सभासद, व्यापारी व हितचिंतक उपस्थिती होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages