कै. शिक्षणमहर्षी बाळासाहेब कोरके यांच्या ६५ जयंतीनिमित्त व्याख्यामला आयोजित

मुंगशी (कटूसत्य वृत्त):- छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेले स्वराज्य हे वतनदारांच्या अथवा जहागिरदारांच्या सुखासाठी नव्हते तर गोरगरीब रयतेच्या सुखासाठी होते. म्हणूनच आजही शिवचरित्र पिचलेल्या, खचलेल्या, दबलेल्या मनाला उभारी देते, असे मत शिवव्याख्याते खंडू डोईफोडे यांनी व्यक्त केले.ते मुंगळी (ता. बार्शी) येथील कौठाळी विद्यालयाच्या वतीने कै. शिक्षणमहर्षी बाळासाहेब कोरके यांच्या ६५ जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात बोलत होते.ते पुढे म्हणाले, शिवाजी महाराज हे प्रभावशक्ती, उत्साहशक्ती, मंत्रशक्तीने निष्णात होते. आणि त्यांचे स्वतंत्र मन हेच स्वराज्याच्या बांधणीचे अधिष्ठान होते.शिवाजी महाराजांनी शिवराज्याभिषेकावेळी भाषा सुधारण्यासाठी राज्यव्यवहारकोष, पंचांग सुधारायला करणकौस्तुभ हे ग्रंथ लिहून घेतले.शिवरायांच्या स्वराज्याचा जाहीरनामा एकच होता, तो सर्वांना काम देणे, आज आपल्या राजकारणाला महाराजांच्या या विचारांची खरी गरज आहे. शिवरायांनी अनेक लढाया या फक्त ढाल-तलवारीच्या बळावर नाही, तर विलक्षण बुद्धिमत्तेच्या जोरावर जिंकल्या. त्यांच्या बुद्धीला नैतिकतेचे अधिष्ठान होते. म्हणूनच शिवाजी महाराजांची प्रशासकीय व्यवस्था आदर्शवत ठरते. शिवाजी महाराजांनी सगळ्या क्षेत्रांत नवनवे आदर्श घालून दिलेले आहेत.यावेळी मुख्याध्यापक सुभाष सुरवसे, माजी सरपंच संग्राम पाटील, माजी सरपंच शिवाजी घोडके-पाटील, सरपंच परिषदेच्या कार्याध्यक्षा कविता घोडके-पाटील, ग्रामपंचायत सदस्य अनिल माने, बंडू सोनार, भैरू माळी, काका साखडके, उमेश पाटील, मुकुंद घोडके, कुमार माने, बप्पा वाकडेसह कौठाळी, भागाईवाडी,शेरेवाडीतील ग्रामस्थ, मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment