जनतेच्या हाकेला साद देत ग्रामपंचायत सदस्यांचे स्वखर्चाने मुरुमीकरण

गावच्या विकासकामांना कधी लागणार मुहूर्त ?
लऊळ (कालीदास जानराव):- ग्रामपंचायत निवडणूक झाली सत्ताही मिळाली जवळपास एक कोटी रुपयांचा निधी मंजूरही झाला. परंतु गेल्या दीड वर्षांपासून गावतील ग्रामपंचायतीची विकासकामे मात्र ठप्प असल्याने नागरिकांची मोठी तारांबळ होत असल्याचे चित्र आहे. पंचायतीच्या विविध विकासकामांचा शुभारंभ माढा तालुक्याचे आमदार बबनराव शिंदे यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात होते.परंतु जसे दिवस उलटत गेले तसे गावची विकासकामे थांबल्याने सहाजिकच गावचा विकासही थांबला.गावाला आलेल्या पालखी निधीतून गावातील खराब झालेले रस्त्यांची मलमपट्टी,गावची स्वच्छता झाली.पंचायतीच्या करवसूलीमधून तुंबलेल्या गटारी व रस्त्यांवरील पथदिवे यांचे काम पार पडले.परंतु गावचा शास्वत होत नसल्याने पावसाळ्यात खराब झालेले रस्ते,गावाबरोबरच वाड्यावस्त्यांवरील बंद असलेले हायमास्ट यांसह या ना त्या कारणाने नागरिकांमधून नाराजीची तीव्रता वाढल्याने सत्ताधारी पार्टीतील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कल्याण गाडे, पवन भोंग,बापू लोकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला.तरीदेखील फारसा फरक पडत नसल्याने अखेर असुविधेच्या त्रासाला कंटाळलेल्या नागरिकांच्या हाकेला साद देत प्रत्येकी पंचवीस हजार रुपये खर्च करून खराब झालेल्या रस्त्याचे मुरुमीकरण केले. स्वखर्चाने केलेल्या कामाबद्दल जनतेतून संबंधितांचे कौतुक होत आहे असे असले तरी ग्रामपंचायतीची विकासकामे कधी सुरू होणार हा प्रश्न सामान्य नागरिकांबरोबर सत्ताधारी गटातील लोकप्रतिनिधीना देखील सतावत असल्याने गावकऱ्यांमधून नाराजीचा सूर असल्याचे चित्र आहे.
यांनी देखील केली तातडीची मदत
नागरिकांची होणारी गैरसोय पाहून माजी जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे यांनी पंचवीस हजार रुपये व पंचायत समिती सदस्य धनराज शिंदे यांनी पंचवीस हजार रुपयांसह पोकलेन व वाहतुकीसाठी टिपरचे सहाय्य केले.
गावकट्टे राजकीय चर्चेत रंगले
ग्रामपंचायत सदस्य कल्याण गाडे,बापू लोकरे यांच्या कौतुकाच्या चर्चेबरोबरच ऐन निवडणुकीच्या तोंडावर माजी जि.प.सदस्य भारत शिंदे व माजी पंचायत समिती सदस्य धनराज शिंदे यांच्या मदतीला "अहो राजकारण दुसरं काय"अशा प्रकारे राजकीय खुमासदार चर्चा गावकट्ट्यावरून होत आहे.
No comments:
Post a Comment