खरीप पेरणी अंतिम टप्प्यात, संकटावर मात करीत शेतकऱ्यांनी साधले उद्दिष्ट..!

पुणे (कटूसत्य वृत्त):- यंदा हंगामापूर्वीच वरुणराजाचे आगमन होणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, सबंध जून महिना तर कोरडाठाक गेला पण आता सरासरी ऐवढ्या क्षेत्रावर खरिपाचा पेरा होणार की नाही अशी स्थिती सबंध राज्यात निर्माण झाली होती.
पेरणीचे मुहूर्त तर टळले होते पण जुलैच्या 1 तारखेपासून राज्यात पावसाने असा काय धूमाकूळ घातला की, पेरलेले पीकही पाण्यात आणि आता वेळ निघून गेल्यावर पेरणीसाठी पोषक वातावरण नसतानाही हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांनी उद्दिष्ट गाठले आहे. केवळ भात लागवडच नाहीतर उर्वरित सोयाबीन, कापूस, मूग या खरिपातील पिकांचा पेराही वाढला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट होईल पण सरासरीच्या तुलनेत खरिपाचा पेरा झाला आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हा आणि भोर तालुक्यात भात लावणीचे काम आता अंतिम टप्प्यात आहे.
हंगामाच्या सुरवातीला पावसाने शेतकऱ्यांची निराशा केली असली तरी जुलैमध्ये सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने खरिपाचे चित्रच बदलले आहे. अतिरिक्त पावसामुळे सोयाबीन, कापूस, उडीद ही पिके पाण्यात असली तरी आता सुधारणा होत आहे. पण पाऊसच बरसला नसता तर खरिपाचे चित्र काही वेगळेच राहिले असते.
पुणे जिल्ह्यातील भाताचे आगार म्हणून ओळख असलेल्या वेल्हा आणि भोर तालुक्यात भात लावणीची कामं आता अंतिम टप्प्यात आलीयेतं, या विभागातील जवळपास 80टक्के भात लावणी पूर्ण झालीयं.जुलै महिन्याच्या सुरवातीपासूनच भात लावणीसाठी समाधान कारक पाऊस झाल्यानं भात लावणीची कामं वेळेवर पूर्ण करण्याची लगबग सुरू आहे.
सध्या पावसाने उघडीप दिली आहे. या काळात पिकांची फवारणी आणि मशागतीवर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. सततच्या पावसामुळे पिकांची वाढ खुंटली होती तर पेरणी क्षेत्रात तणाचा जोरही वाढला होता. यावर पर्याय म्हणून आता किटकनाशकाची फवारणी त्याचबरोबर शेती मशागतीवर शेतकऱ्यांचा भर आहे. एकरी हजारो रुपये खर्चून शेतकऱ्यांनी बियाणे जमिनीत गाढले आहे. त्याचे उत्पादनात रुपांतर करण्यासाठी आता शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. त्यामुळे पावसाची उघडीप असीच काही दिवस राहिली तर खरिपातील पिके जोमाने वढतील असा विश्वास शेतकऱ्यांना आहे.
No comments:
Post a Comment