स्वयंसेवक नेमून त्यांच्या माध्यमातून सण-उत्सवांचे नियोजन करावे- पोलिस आयुक्त माने

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आषाढी, बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटी बैठकीत आयुक्त माने यांचे आवाहन आपले शहर शांतता आणि उत्सवप्रिय आहे. यावर्षी आषाढी एकादशी आणि बकरी ईद हे दोन्ही सण एकाच दिवशी आहेत. यापूर्वीही अनेकदा असे सण एकत्र आले आहेत. शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात आपण सण साजरा करतो. एकोप्याची भावना ठेवतो. यासाठी सगळ्यांनी कायदा पाळावा. स्वयंसेवक नेमून त्यांच्या माध्यमातून सण-उत्सवांचे नियोजन करावे, असे आवाहन पोलिस आयुक्त राजेंद्र माने यांनी केले. पोलिस आयुक्तालयात मंगळवारी शांतता कमिटी सदस्यांची बैठक पार पडली, या वेळी श्री. माने बोलत होते.
जातीय तेढ निर्माण करणारे संदेश सोशल मीडियावर आल्यास पोलिसांना माहिती द्या, अथवा स्वतःच ते डिलिट करा. कुठलीही अफवा पसरवू नका. सण, उत्सव शांततेत साजरा करा. पोलिसांची वाढीव गस्त, बंदोबस राहीलच. प्रार्थनास्थळ, आपला परिसर स्वच्छ ठेवा, उत्सव साजरा करताना आपली वर्तणूक चांगली ठेवा, एकोपा ठेवा, लोकांना त्रास होईल असे वागू नका. गालबोट लागू देऊ नका. पोलिस आपल्या सोबत आहेत, मदतीसाठी त्यांना संपर्क करा, मदत घ्या. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कोणीही करू नका. नियम पाळा, असे आवाहन आयुक्त माने यांनी केले. सातही पोलिस ठाणे हद्दीत शांतता कमिटीच्या माध्यमातून बैठका घ्या. नागरिकांशी संवाद साधा. सण उत्सवाचे महत्त्व पटवून सांगा, अशा सूचना आयुक्त यांनी पोलिस निरीक्षक, सहायक आयुक्त यांना केल्या.
वेळेवर पाणी सोडा
रविवारी बकरी ईद असल्यामुळे पाणी भरपूर प्रमाणात सोडा. घंटागाडी त्या दिवशी दोन ते तीन वेळा फिरवा. वारंवार साफसफाई करण्यासाठी कर्मचारी नेमा. लाइट, रस्ते, ड्रेनेज याबाबत नियोजन करा, अशा सूचना नागरिकांनी बैठकीत केल्या.
पोलिस उपायुक्त बापू बांगर, वैशाली कडुकर, महापालिकेचे सहायक उपायुक्त श्री. घोलप, महावितरणचे अधिकारी मेहता, सहायक आयुक्त दीपक आर्वे, अजय परमार, माधव रेड्डी, प्रांजली सोनावणे व सर्व पोलिस निरीक्षक, मनपाचे पशुसंवर्धन, सफाई विभाग, पाणी विभाग, मंडई विभाग अधिकारी उपस्थित होते.
शहरात आठ ठिकाणी नाकाबंदी
बकरी ईदनिमित्त शहरातील मुख्य प्रवेश रस्त्यांवर आठ ठिकाणी नाकाबंदी राहणार आहे. प्राणी मित्र, गोरक्षक यांनी जनावरांची वाहतूक करणारी वाहने अडवणे, चौकशी करणे असे काम करू नये. त्यांनी पोलिसांनाच माहिती द्यावी, असे आवाहन पोलिस उपायुक्त डॉ. वैशाली कडुकर यांनी शांतता कमिटी बैठकीत केले.
पोलिस आयुक्तालयात बकरी ईदच्या निमित्ताने शांतता कमिटीच्या बैठकीत पोलिस आयुक्त राजेंद्र माने यांनी मार्गदर्शन केले. या वेळी उपस्थित सदस्य व मान्यवर.
No comments:
Post a Comment