आजादी का अमृत महोत्सव" अंतर्गत "हर घर तिरंगा/झेंडा" उपक्रम राबविणेबाबत

या उपक्रमात नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन आपले योगदान देण्याचे आवाहन
सोलापूर, (कटुसत्य वृत्त):- राज्याचे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे उप सचिव यांच्या दिनांक २८ सप्टेंबर, २०२० च्या शासन निर्णयानुसार भारताच्या स्वातंत्र्याचा दिनांक १५ ऑगस्ट, २०२१ रोजी ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. या गौरवशाली पर्वानिमित्त, "आजादी का अमृत महोत्सव" अर्थात "भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" दिनांक १२ मार्च, २०२१ ते दिनांक १५ ऑगस्ट, २०२३ या कालावधीत विविध कार्यक्रम/उपक्रमांद्वारे आयोजित करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत.
केंद्र शासनाच्या संस्कृति मंत्रालयाने जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढयाच्या स्मृति तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल भावना कायमस्वरुपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे या उददेशाने "आजादी का अमृत महोत्सव" अंतर्गत दिनांक ११ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये सोलापूर जिल्हयात "हर घर तिरंगा/झेंडा" हा उपक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे.
७५ फुट उंच राष्ट्रध्वज उभारणी
"आजादी का अमृत महोत्सव" हा उपक्रम दिनांक ११ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र राबविण्यात येणार आहे. यानिमित्त दि. १५ ऑगस्ट, २०२२ रोजी सोलापूर जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात ७५ फुट उंच राष्ट्रध्वज उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने जागेची पाणी व ध्वज उभारणीबाबत पुढील कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या आहेत.
जिल्हास्तरावर स्वराज्य महोत्सवाचे आयोजन
"आजादी का अमृत महोत्सव" या उपक्रमा अंतर्गत दि. ९ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत सोलापूर जिल्हास्तरावर स्वराज्य महोत्सव आयोजन करणे तसेच वाकेथॉन, सायक्लोथॉन चे आयोजन केले जाणार आहे यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाने सक्रिय सहभाग घेऊन उपयुक्त उपक्रम प्रभावीपणे राबवावेत. तसेच या उपक्रमा अंतर्गत दि. ११ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत नागरिकांना/शासकीय/निमशासकीय / सहकारी संस्था व खाजगी आस्थापना यांनी त्यांच्या वास्तूवर राष्ट्रध्वज उभारण्याबाबत सर्व संबंधित विभागाने प्रयत्न करावेत यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करावी.
ग्रीन बेल्ट व फ्रीडम पार्कची निर्मिती करावी
या अंतर्गत सोलापूर महापालिकेने ग्रीन बेल्ट व स्वातंत्रय बागेची (फ्रिडम पार्क) निर्मिती करण्यासाठी कार्यवाही करावी. राज्यस्तरावर वन विभागाकडून या कालावधीत वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली जाणार आहे त्या अनुषंगाने वनविभागाने सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लगवड करण्याबाबतचे नियोजन करावे.
ग्रामसभांचे आयोजन
ग्रामविकास विभागाच्या परिपत्रकानुसार दिनांक ९ ऑगस्ट २०२२ रोजी ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामसभा घेऊन आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या हार घर झेंडा या उपक्रमाबाबत प्रबोधन करावे व प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर दिनांक ११ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत तिरंगा ध्वज उभारण्यासाठी त्यांना ग्रामसभेच्या माध्यमातून प्रोत्साहित करावे.
या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या सूचना खालीलप्रमाणे :-
- सर्व शासकीय/निमशासकीय यंत्रणांनी प्रसार माध्यमातून देशाभिमान व जाणीव-जागृतिची मोहिम प्रभावीपणे राबवणे.
- दिनांक ११ ते १७ ऑगष्ट २०२२ या कालावधीत प्रत्येक शासकीय/निमशासकीय व खाजगी आस्थापनांवर तसेच प्रत्येक घर व इमारतीवर राष्ट्रध्वज उभारणेसाठी नागरीकांना प्रोत्साहीत करणे.
- नागरिकांनी राष्ट्रध्वज स्वतः विकत घेऊन उभारण्यासाठी त्यांना प्रेरीत करणे.
- राष्ट्रध्वज उभारणीसाठी जास्तीत जास्त प्रसिध्दी करणे. यामध्ये प्रामुख्याने सामाजिक माध्यमांचा जास्तीत जास्त वापर करण्यात यावा.
- केंद्रीय गृह विभाग यांच्या दिनांक- ३० डिसेंबर २०२१ रोजीच्या अधिसूचनेन्वये भारतीय ध्वज संहिता २०२२ भाग-१ मधील परिच्छेद १.२ मधील राष्ट्रध्वज हे "हाताने कातलेल्या किंवा विणलेल्या लोकर/सुत/सिल्क/खादी कापडापासून बनविलेला असेल" या तरतूदीमध्ये बदल करण्यात आला असून सदर बदलानुसार राष्ट्रध्वज हे हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सुत/पॉलिस्टर/लोकर/सिल्क/खादी पासून बनविलेल्या कापडाचे असावेत असा उल्लेख केला आहे. या बदललेल्या तरतूदीनुसार तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाचा वापर या प्रयोजनासाठी करता येईल.
- संगीतानूनही राष्ट्रध्वजाबाबत वेगवेगळया पध्दतीने सादरीकरण करता येईल.
- "हर घर तिरंगा झेंडा" या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नियोजनबध्द कार्यक्रमाची आखणी करणे.
- या उपक्रमामध्ये राज्य/देशातील/परदेशातील सहभागी होणा-या व्यक्तींची नोंद घेणे.
- राष्ट्रध्वज मुबलक उपलब्ध होणेबाबत खात्री संबंधित यंत्रणांनी करणे.
- भारतीय ध्वज संहितेचे पालन व्हावे व जाणते-अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये, याची दक्षता घेण्याबाबत नागरिकांमध्ये जाणीव-जागृती करणे.
- "हर घर तिरंगा/झेंडा" या उपक्रमांतर्गत कार्यक्रमाची छायाचित्रे, चित्रफिती, ध्वनीमुद्रण इ. केंद्र शासनाच्या संस्कृति मंत्रालयाच्या anritmahotsav.nic.in या संकेत स्थळावर अपलोड करणे.
- नागरिकांमध्ये या उपक्रमाबाबत रुची निर्माण करण्यासाठी वेबसाईट, ई-कॉमर्स तसेच राष्ट्रध्वज भेट देणे अशा माध्यमांचा आधार घेण्यात यावा.
- स्थानिक स्वराज्य संस्था, पोलिस यंत्रणा, शाळा व महाविद्यालये, परिवहन, आरोग्य केंद्रे, स्वस्त भाव धान्य दुकाने, सहकारी संस्था अशा सर्व सामान्य नागरीकांशी निगडीत यंत्रणांचा वापर करुन सदर कार्यक्रम यशस्वी करण्यात यावा.
आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर झेंडा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शासकीय व निम शासकीय यंत्रणांनी त्यांच्या स्तरावरून प्रत्येक गावात व प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये स्वातंत्र्य लढयाच्या स्मृति तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल भावना कायमस्वरुपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे यासाठी प्रयत्न करणार आहे. प्रशासनाच्या या उपक्रमात प्रत्येक देश प्रेमी नागरिकांनी आपले योगदान देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment