उजनी धरणात पाणी येण्यास प्रारंभ...

दीड दिवसात 2 टक्के पाणी वाढ...
बेंबळे (कटुसत्य वृत्त): सोलापूर पुणे व अहमदनगर जिल्ह्याची भाग्यवरदाईनी असलेल्या उजनी धरणात 9 जुलै 22पासून दौंडयेथुन भीमा नदीत 20 हजार क्युसेक्सने पाणी येण्यास प्रारंभ झालेला असून ही सर्वत्र आनंदाची वार्ता ठरत आहे.
सविस्तर वृत्तांत असा की 15 ऑक्टोबर 21 रोजी उजनी धरण 111 टक्के पूर्ण क्षमतेने भरले होते व त्यामध्ये 123 टीएमसी पाणीसाठा झालेला होता. संपूर्ण रब्बी व नंतरच्या उन्हाळी हंगामामध्ये धरणाच्या यशवंत जलाशयांमधून 16 ऑक्टोबर 21 ते 5 मे 22 पर्यंत पिण्यासाठी, शेती, उपसा सिंचन योजना, साखर कारखाने, एमआयडीसी, मोठमोठे उद्योग धंदे, वीज निर्मिती केंद्र इत्यादी माध्यमाद्वारे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊन 6 मे 22 रोजी धरणातील जिवंत पाणीसाठा समाप्त होऊन धरणात मायनस(- उणे)-1.02 % पातळी झालेली होती , या संपूर्ण हंगामामध्ये 60 टीएमसी पाण्याचा वापर झाला होता व मृतसाठा 63 टीएमसी शिल्लक असून यातूनच पुढील पाण्याचा वापर आज पर्यंत सुरू आहे, यामुळे 8 जुलै 22 रोजी जलाशयाची पाणी पातळी मायनस( -उणे) 12.30 टक्के पर्यंत खालावली होती.
सध्याच्या 2022 पावसाळ्यामध्ये पहिला एक महिना पावसाने सर्वत्र ओढ दिलेली होती परंतु तीन ते चार जुलैपासून पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र पावसाची दमदार सुरुवात झालेली आहे. पुणे जिल्ह्यातील लहान-मोठी 18 धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याशिवाय बंड गार्डन व दौंड येथून भीमा नदीत विसर्ग सुरू होत नाही, परंतु सध्या सर्वत्र संततधार पाऊस असल्यामुळे चोहोबाजूनी भीमा नदीत पाण्याचा विसर्ग वाढत आहे. पुणे जिल्ह्यात मावळ भाग, लोणावळ्याचा पश्चिम भाग, भीमाशंकरचे डोंगर इत्यादी ठिकाणी मागील चार-पाच दिवसांपासून दमदार पाऊस होत असल्यामुळे पुणे जिल्ह्यातील मुळा, मुठा, इंद्रायणी, पवना या प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत व याचाच परिणाम म्हणून आठ जुलै 22 रोजी दौंड येथून सुरुवातीला 20 हजार क्यूसेक्स विसर्गाने भीमा नदीत पाणी येऊ लागले आहे व तब्बल 30 ते 35 तासानंतर नऊ जुलै रोजी सकाळी अकरा वाजले पासून उजनी जलाशयात पाणी येण्यास प्रारंभ झालेला आहे. सध्या उजनी जलाशयात 19 हजार क्युसेक्स विसर्गाने पाणी येत असून पाणी पातळीत 2 टक्के वाढ होऊन धरणात (-उणे) मायनस -10.26 टक्के पाणीसाठा तयार झालेला आहे ,त्यामुळे अवघ्या दीड दिवसात धरणामध्ये 2 टक्के पाणी आलेले आहे. असाच पाण्याचा विसर्ग चालू राहिला किंवा त्यात वाढ झाली तर आगामी तीन ते चार दिवसात धरणातील पाण्याची टक्केवारी 'मायनस' मधून 'प्लस' येईल हे निश्चित.
नऊ जुलै 22 रोजी सायंकाळची उजनीची स्थिती......
पाणी पातळी 490.160 मीटर
एकूण साठा 1637.92 दशलक्ष घनमीटर
57. 84 टीएमसी
उपयुक्त साठा उणे -164.89 दशलक्ष घनमीटर
उणे - 5.82 टीएमसी
टक्केवारी उणे -10 26%
विसर्ग :-
दौंड येथून भीमा नदी -19,127 क्यूसेक्स
बंडगार्डन - 00 क्यूसेक्स
कालवा - बंद,
गाळमोरी - 500 क्यूसेक्स
बोगदा - 150 क्यूसेक्स
धरण परिसरात पाऊस -28 मिलिमीटर
No comments:
Post a Comment