बेंबळे परिसरात संसर्गजन्य रोगाच्या रुग्ण संख्येत वाढ...

शासकीय आरोग्य यंत्रणेने तातडीने लक्ष द्यावे...
बेंबळे (कटूसत्य वृत्त):- मागील आठ ते दहा दिवसापासून असलेल्या ढगाळ पावसाळी वातावरणाचा बेंबळे परिसरात परिणाम दिसून येऊ लागला असून संसर्गजन्य रोगाचे रुग्ण वाढू लागले आहेत .थंडी, ताप, खोकला ,अंगदुखी, डोकेदुखी, सर्दी ,पडसे घसा दुखणे ,अशक्तपणा येणे अशा प्रकारचे रुग्ण घरोघरी दिसून येऊ लागले आहेत. यामुळे दवाखान्यात रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे, ग्रामीण आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स, नर्स व कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन शासकीय औषधांचा रुग्णांना पुरवठा करावा व त्यांना योग्य तो सल्ला देऊन रुग्ण बरे करण्याचे प्रयत्न करावेत अशी रास्ता अपेक्षा सर्वसामान्य नागरिकातून होत आहे. या परिसरातील खाजगी दवाखान्यात रुग्णांची गर्दी दिसून येत आहे, परंतु लहान मुले, वृद्ध नागरिक, महिला अशा रुग्णांना येथील नागरिक टेंभुर्णी अकलूज पंढरपूर कुर्डूवाडी अशा शहरातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेत आहेत .मागील सहा ते सात दिवस सतत काही काळ मोठापाऊस होत आहे तर बराच वेळ रिमझिम पाऊस होत असल्यामुळे व सूर्यदर्शन दुर्मिळ झालेले असल्यामुळे सर्वत्र चिखल, खड्डे, दल दल ,थंड वातावरण यामुळे नागरिक वैतागून गेले आहेत. यातच अंगणवाडी पासून कॉलेजपर्यंत येणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनी पैकी शेकडो विद्यार्थी वाड्यावस्यावरून येत आहेत, वातावरणातील थंडी, वारा, पाऊस यामुळे संसर्गजन्य आजार वेगाने पसरत आहेत .तसेच शेतामध्ये असलेल्या पशुधनाचेही अतोनात हाल होत आहेत, यातच कित्येक तास विद्युत पुरवठा बंद पडत आहे. शेतामध्ये असलेली जनावरे शेळ्या, मेंढ्या यांचेही दलदल व चिखलामुळे अतोनात हाल होत आहेत. ग्रामीण भागात शासकीय आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून युद्धपातळीवर काम करावे व नागरिकांना शक्य होईल तेवढ्या औषधांचा पुरवठा करावा व योग्य ते सल्ले द्यावेत अशी रस्ता अपेक्षा नागरिकातून होत आहे.
No comments:
Post a Comment