ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेऊ नयेत - पंकजाताई मुंडे

राज्य सरकारने निवडणूक आयोगाशी चर्चा करून आताच्या निवडणूकांना स्थगिती द्यावी
मुंबई (नासिकेत पानसरे): ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केली आहे. आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे, ती कायम ठेवण्यास सांगितलं आहे. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पंकजाताई मुंडे यांनी आपली भूमिका मांडली.
पंकजाताई मुंडे म्हणाल्या की,
“कोर्टाची ऑर्डर माझ्या हातात नाही. मात्र ज्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत त्या घेणं क्रमप्राप्त आहे असं कोर्टानं म्हटलं आहे. या प्रसंगात माझी अपेक्षा फक्त सरकारकडून आहे. ओबीसींच्या प्रश्नावर लढणारी एक कार्यकर्ता म्हणून मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करणार आहे की या निवडणुकांच्याबाबतीत निवडणूक आयोगाशी त्यांनी चर्चा करावी आणि या निवडणुकांना स्थगिती द्यावी.”या स्थगितीचं मुख्य कारण हे अर्थातच ओबीसी आरक्षण नसणं हे असलं पाहिजे. आत्ता जवळपास ९२ ठिकाणी नगरपरिषदेच्या व काही नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका झाल्यानंतर उरलेल्या निवडणुकांना ओबीसी आरक्षण देणं हा पुन्हा समान न्याय नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षण मिळणार आहे हा आत्मविश्वास नव्या आलेल्या सरकारमुळे लोकांमध्ये निर्माण झाला आहे. हा आत्मविश्वास तेव्हाच फलित ठरेल जेव्हा सर्वांना ओबीसी आरक्षण मिळेल. राजकीय आरक्षणाच्या माध्यमातूनच या ओबीसी आरक्षणाच्या निवडणुका झाल्या पाहिजेत असं ठाम मत पंकजाताईंनी माध्यमांशी बोलतांना व्यक्त केलं.
No comments:
Post a Comment