उजनी धरणाने 50 टक्के पाणी पातळी ओलांडली ; धरणात 91 टीएमसी पाणीसाठा...

गतवर्षीपेक्षा 13 दिवस लवकर 50% पातळी पुणे जिल्ह्यातील 19 धरणातील पाणी पातळीत विक्रमी वाढ
बेंबळे(कटूसत्य वृत्त):- उजनी धरणातील जलाशयामधे 19 जुलै 22 रोजी दुपारी 50 टक्के पाणीपातळी ओलांडली असून मागील वर्षी 2021 च्या पावसाळ्यात 31 जुलै 21 रोजी रात्री नऊ वाजता उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा झाला होता परंतु आज 19 जुलै रोजी सायंकाळी 50.97% पाणीसाठा झालेला आहे, म्हणून मागील वर्षीपेक्षा पेक्षा 13 दिवस अगोदर हा पाणीसाठा झालेला दिसुन येत आहे ,त्यामुळे धरणात सध्या 91 टीएमसी पाणी साठा झालेला असून पाणी पातळी 494.970 मीटर पर्यंत पोहोचली आहे. सध्या पुणे विभागात पावसाचा वेग मंदावला असल्यामुळे भीमा नदीच्या दौंड येथून येणाऱ्या विसर्गा मध्ये सतत चढ-उतार दिसून येत आहे, तरीही 19 जुलै रोजी सायंकाळी दौंड विसर्ग 24 हजार 172 क्युसेक्स असून बंडगार्डन(पुणे ) विसर्ग 9720 क्युसेक्स आहे.
सोलापूर जिल्ह्यात पाऊस असो वा नसो, उजनी जलाशयातील पाणी पातळीचा संबंध हा पुणे जिल्हा, मावळ भाग, भीमाशंकरचे डोंगर व लोणावळ्याचा पश्चिम भागातील पावसावर व त्या भागातील मुळा,मुठा, पावना, कर्हा, इंद्रायणी या नद्यांतून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहावर अवलंबून आहे कारण या सर्व नद्या काही ठराविक अंतराने पुढे भीमा नदीला येऊन मिळतात .
उजनीच्या वरील भागात पुणे जिल्ह्यातील नद्यावर 19 धरणातील पाणी पातळी वाढल्यानंतर त्यातून पुढे येणाऱ्या पाण्यावर उजनीची पातळी अवलंबून असते. सध्याच्या पावसाळ्यात एक जुलैपासून पुणे जिल्हा व परिसरात मोठ्या प्रमाणावर दमदार व सतंतधार पाऊस झालेला असल्यामुळे उजनी वरील 19 धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ दिसून येत आहे. ही लहान- मोठी धरणे 2 टीएमसी पासून 11 टीएमसी पर्यंत पाणी साठवण क्षमतेची आहेत. त्यानुसार सध्या पिंपळजोगे 51% ,माणिक डोह 49 टक्के, येडगाव 94%, वडज 78%, डिंभे 63%, घोड 77%, विसापूर 34%, , कळमोडी 100%, चासकमान 97% ,भामा आसखेडा 84 टक्के, वडिवळे ८२ टक्के, आंध्रा 100 टक्के, पवना 69 टक्के, कासारसाई 87%, मुळशी 66%, टेमघर 52%, वरसगाव 61 टक्के ,पानशेत 71 टक्के व खडकवासला 100 टक्के असा पाणीसाठा झालेला आहे,तसेच यातील तीन धरणे 100 टक्के भरली आहेत ,तीन धरणातील पाणी पातळी 85% च्या पुढे आहे, 9 धरणामध्ये 75 टक्के पेक्षा जास्त पाणी आहे व उर्वरित 4 धरणामध्ये 50 टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा आहे, त्यामुळे सध्या ज्या धरणातील पाणीसाठा मर्यादित पातळीपेक्षा जास्त होतो त्या धरणातून पाण्याचा विसर्ग खाली सोडला जातो व त्यामुळे भीमा नदीत येणाऱ्या दौंड विसर्गा मध्ये सतत चढ-उतार दिसून येत आहे. तरीपण संथ गतीने का असेना उजनीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे ही समाधानकारक बाब आहे.
No comments:
Post a Comment