केंद्रीय पुरात्त्व विभागाने महाराष्ट्राच्या स्थळांच्या रखरखावाविषयी विधीमंडळात अहवाल सादर करावा - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
नवी दिल्ली, (कटूसत्य वृत्त): महाराष्ट्रातील एकवीरा देवी मंदिर, लेण्याद्री मंदिरासोबतच अन्य ऐतिहासिक धार्मिक स्थळे, जी केंद्रीय पुरात्त्व विभाागाच्या नियंत्रणात येतात त्यावर झालेल्या रखरखावाच्या खर्चाच्याविषयी अहवाल विधीमंडळाच्या पटलावर पुरात्त्व विभागाने सादर करावा, याबाबतचे निवेदन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सादर केले असल्याची माहिती विधान परिषदच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी आज महाराष्ट्र सदन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले, राज्यातील जी ऐतिहासिक स्थळे, मंदिरे, स्मारके केंद्रीय पुरात्त्व विभागाच्या नियंत्रणात येतात. ईच्छा असून देखील राज्यातील जनतेला तसेच राज्यशासनाला अशा स्थळांचे नविनीकरण, सौंदर्यीकरण, डागडूजी करता येत नाही. तसेच पुरात्त्व विभागाकडूनही अनेक वर्षांपासून डागडूजी होत नसल्याची शंका डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली. त्यामुळे अशा स्थळांची अधिकच दुरावस्था होत चाललेली आहे. केंद्रीय पुरात्त्व विभागातंर्गत येणा-या राज्यातील स्थळांमध्ये काय काम केले आहे याविषयी केंद्रीय पुरात्त्व विभागाने विधीमंडळात अहवाल सादर करावा, याबाबतचे निवेदन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिले असल्याची माहिती डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी दिली. लोकसभा अध्यक्ष हे संबंधित विभागाला निर्देशित करतील अशी, अपेक्षा डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली असल्याचे त्यांनी सांगितले.
0 Comments