जिल्ह्यात कृषीपंपाची ५ हजार कोटींची थकबाकी; दीड महिन्यात १४०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्यातील शेतकऱ्यांकडील कृषीपंपाची महावितरणची तब्बल ६० हजार कोटींपर्यंत थकबाकी आहे. त्यात सोलापूर जिल्हा अव्वल असून जिल्ह्यात कृषीपंपाची पाच हजार कोटींची थकबाकी आहे. तरीही, शेतकऱ्यांनी कृषीपंप वीज धोरणाअंतर्गत ३१ मार्च २०२२ पर्यंत एक हजार ६०० कोटी रुपये भरल्यास त्यांची वीजबिलाची थकबाकी काहीच राहणार नाही, अशी माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी दिली. कृषीप्रधान राज्यात शेतकऱ्यांना मोफत वीज मिळावी ही खूप जुनी मागणी आहे. परंतु, विविध अडचणींमुळे त्यासंदर्भात अद्याप सकारात्मक निर्णय होऊ शकला नाही. शेतकऱ्यांकडील वीजबिलाची थकबाकी वसूल करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने महावितरणला त्यासंदर्भात मदत करावी, असा प्रस्ताव अनेकदा महावितरणने पाठविला. मात्र, कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती बिकट झाल्याने तुर्तास त्यावर काहीच निर्णय झाला नाही. त्यामुळे आता महावितरण अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडील वीजबिलाची थकबाकी वसूल करण्यासाठी कृती आराखडाच तयार केला आहे. ३१ मार्च (४१ दिवसांत) थकबाकीदार शेतकऱ्यांना ६५ टक्क्यांची सवलत देऊन त्यांच्याकडून वीजबिलाची थकबाकी वसूल करावी, असे निर्देश वरिष्ठांनी दिले आहेत. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे पाच हजार कोटींची थकबाकी असून सवलतीच्या योजनेअंतर्गत सोळाशे कोटी रुपये भरावे लागणार आहेत. परंतु, मागील वर्षभरात केवळ दोनशे कोटींचीच वसुली झाली आहे. त्यामुळे आता अधिकाऱ्यांनी कारवाई तीव्र केली असून अनेक शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जात आहेत.
अधिकाऱ्यांना सक्त सूचना...
-कृषी पंप वीज धोरणाअंतर्गत शेतकऱ्यांना वीजबिलाच्या थकबाकीसाठी सवलत द्यावी
-थकबाकी न भरणाऱ्यांचे वीज कनेक्शन जागेवरच तोडावे
-३१ मार्चनंतर थकबाकीदारांना वीज कनेक्शन थकबाकी भरल्याशिवाय देऊ नये
-वीजचोरी प्रकरणात थेट गुन्हे दाखल करा; दीड महिन्यांत चौदाशे कोटींची वसुली अपेक्षित
-डीपीवरील सर्वच शेतकरी थकबाकीदार असल्यास डीपीचे तोडावे कनेक्शन
0 Comments