सरकारने शेतकऱ्यांची जुलमी पद्धतीने वीज तोडणी मोहीम राबवली आहे
- धैर्यशील मोहिते-पाटील
अकलूज (कटूसत्य वृत्त) :- सर्व सामान्य नागरिक व शेतकरी बांधव कोरोना आणि त्यानंतर झालेल्या तीव्र अतिवृष्टीमुळे आर्थिकदृष्ट्या अगदी कोलमडून गेला आहे. शेतकऱ्यांना अडचणीच्या परिस्थितीत दिलासा देणे आवश्यक असताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची जुलमी पद्धतीने वीज तोडणी मोहीम राबवली आहे.असे भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांनी माळशिरस येथे रस्ता रोको आंदोलनावेळी म्हणाले.
पुढे बोलताना मोहिते पाटील म्हणाले, आघाडी सरकारने सक्तीने वीज बिल वसूली व वीज तोडणी करून जनतेला वेठीस धरत छळवणूक करत आहे.वीज बिल भरले नाही म्हणून वीज पुरवठा खंडीत करून महावितरण कंपनीने जनतेप्रती असंवेदनशीलता दाखवून देऊ नये महावितरण कंपनीने जबरदस्तीने शेतक-यांच्या शेती पंपाचे व सर्वसामान्यांच्या घरगुती कनेक्शनची वीज तोडणी व वीज बिलं वसूली तात्काळ थांबवावी.
तसेच परमबीर सिंह यांचे पत्र धक्कादायक आणि खळबळजनक असून महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारी ही घटना आहे. एका महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याने थेट गृहमंत्र्यावर आरोप करण्याची ही पहिलीच वेळ आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते असा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. डीजी दर्जाचा अधिकारी इतक्या गंभीर स्वरुपाचे आरोप करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पोलीस दलात धक्कादायक घटना घडत आहेत. त्यामुळे पोलिसांचं मनोधैर्य खच्ची होत आहेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप अतिशय गंभीर आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार उरत नाही.
हे प्रकरण फार गंभीर असून याची केंद्रीय तपास यंत्रणा किंवा न्यायपालिकेच्या नियंत्रणाखाली चौकशी व्हायला हवी. ही चौकशी निष्पक्ष होण्यासाठी गृहमंत्री देशमुख यांचा पदावरून राजीनामा घ्यायला हवा किंवा त्यांची तात्काळ हकालपट्टी करावी, असे म्हणून जो पर्यंत महावसुलीबाज गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला जात नाही तो पर्यंत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आंदोलन करत रहाणार असल्याचेही ते म्हणाले. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या महावसुली गृहमंत्र्यांच्या विरोधात व शेतकऱ्यांची वीज तोडणी मोहीम जुलमी पद्धतीने राबवित असलेल्या महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी आ. रणजितसिंह मोहीते पाटील, आ. राम सातपुते, जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहीते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व सामान्य नागरिक शेतकरी माळशिरस येथे रस्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते. या वेळी भारतीय जनता पार्टीचे के.के.पाटील, बाजीराव काटकर, अप्पा देशमुख, बाळासाहेब सरगर, बाळासाहेब वावरे, धर्मराजमाने, संजयकांता देशमुख, दादासाहेब मोटे, संग्रामसिंह रणनवरे, आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments