कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरीकांनी शासनास सहकार्य करावे: आमदार शहाजीबापू पाटील.
सांगोला(प्रतिनिधी): सध्या जगभरात कोरोना या विषाणूने थैमान घातल्यामुळे जगभरातील नागरिकांचे आरोग्य संकटात आले आहे भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक महाराष्ट्रात झाली असून यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब व त्यांचे मंत्रीमंडळातील सर्व सहकारी दिवसरात्र परिश्रम घेत आहेत. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शासनाने अत्यंत काटेकोर सूचना दिल्या आहेत त्याची तंतोतंत अंमलबजावणी करून सांगोला मतदारसंघातील तमाम नागरिकांनी शासनास सहकार्य करून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन आमदार शहाजीबापू पाटील यांनी पत्रकाद्वारे केले आहे. मंगळवार दि 17 मार्च रोजी शासकीय विश्रामगृह मध्ये कोरोना विषाणू उपाययोजना संदर्भामध्ये आमदार शहाजीबापू पाटील यांनी बैठक आयोजित केली होती या बैठकीसाठी माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील, मंगळवेढ्याचे प्रांताधिकारी उदयसिंह भोसले, सांगोल्याचे तहसीलदार योगेश खरमाटे, तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव उपस्थित होत्या. या बैठकीमध्ये आमदार शहाजीबापू पाटील यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता तालुक्यामध्ये काय उपाययोजना केल्या आहेत याचा आढावा घेऊन शासनाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी तातडीने करण्याचे प्रशासनास आदेश दिले आहेत. याबाबत कोणताही हलगर्जीपणा व दुर्लक्ष न करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिली. पुणे - मुंबई येथून येणारे सांगोला तालुक्यातील सर्व नागरिकांची माहिती ठेवून या मध्ये जर कोणी आजारी आढळल्यास त्वरित तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यांच्यावर उपचार करण्याच्या व संशयित रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष स्थापित करणेसाठी सूचनाही प्रशासनाला दिल्या आहेत. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारद्वारे नागरिकांना कोरोना विषाणूबाबत दुर्लक्ष न करता गांभीर्याने सूचना पाळाव्यात शक्यतो घरामध्येच राहावे, अति गरजेचे काम असल्यासच कामापुरते बाहेर यावे, अनावश्यक प्रवास टाळावा,वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता ठेवावी व कुठेही गर्दी करु नये आजारी असल्यास त्वरित डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment