विद्यार्थ्यांवरील हिंसाचारासाठी केंद्र सरकार जबाबदार : राहुल गांधी
नवी दिल्ली (कटूसत्य वृत्त): विद्यार्थी आंदोलनादरम्यान आंदोलकांवर झालेल्या कथित हिंसाचारासाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी केला. विद्यार्थ्यांशी संबंधित घटनांबाबत संसदेत स्पष्टीकरण देण्याचे धाडस केंद्र सरकारकडे नसल्याची टीकाही त्यांनी केली.
काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या १०, जनपथ येथील शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर भूमिका मांडली. यापूर्वी त्यांनी पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात आंदोलन करणाऱ्या विविध राज्यांतील विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
राहुल गांधी म्हणाले, "मी विविध राज्यांतील तरुण आंदोलकांची भेट घेतली. संविधान, शिक्षण व्यवस्था आणि देशाच्या भविष्यासाठी ते लढत आहेत, याचा मला अभिमान आहे. ढासळलेली आणि निरुपयोगी शिक्षण व्यवस्था बदलण्याची मागणी करणे हा गुन्हा नाही."
त्यांनी आरोप केला की, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर मारहाण करण्यात आली, त्यांना धमकावण्यात आले आणि विविध प्रकारच्या दबावाला सामोरे जावे लागले. "विद्यार्थी हिंसाचार करत नव्हते किंवा आक्रमक वागत नव्हते. तरीही त्यांच्यावर बलप्रयोग करण्यात आला. या घटनांसाठी केंद्र सरकारने उत्तर द्यावे," अशी मागणी त्यांनी केली.
रिया अहिर यांचा ऑनलाइन छळाचा आरोप
या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मॉडेल रिया अहिर यांचाही समावेश होता. मुंबईतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांच्या वाहनासमोर उभे राहिल्याचा त्यांचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
रिया अहिर यांनी सांगितले की, आंदोलनादरम्यान त्यांनी सुमारे २० विद्यार्थ्यांना कथित बेकायदेशीर अटकेपासून वाचवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर आपला छळ सुरू असून, हा केवळ ट्रोलिंगचा प्रकार नसून गुन्हा असल्याचे त्यांनी म्हटले. याप्रकरणी त्यांनी पोलिसांकडे तक्रारही दाखल केली असल्याची माहिती दिली.

No comments:
Post a Comment