सोलापूरमध्ये १.११ लाख रेशनकार्डधारक अपात्र; लाभ कायमचा बंद होणार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- केंद्र सरकारकडून अंत्योदय योजनेमधील लाभार्थींना दरमहा (प्रतिकार्ड ३५ किलो, २२ किलो गहू, १३ किलो तांदूळ) व प्राधान्यक्रमातील कुटुंबांना (प्रतिव्यक्ती तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ) मोफत धान्य दिले जाते.
मात्र, आता निकषांत न बसणाऱ्या सोलापूर शहरातील ३९ हजार १२२ आणि ग्रामीणमधील ७२ हजार ४८ रेशन कार्डधारकांचे धान्य कायमचे बंद होणार आहे.
सोलापूर शहरात अंत्योदय व प्राधान्यक्रमातील पाच लाख १९ हजार लाभार्थी आहेत. तर ग्रामीणमध्ये सव्वाचार लाखांहून अधिक लाभार्थी प्राधान्यक्रम व अंत्योदय योजनेमधील आहेत. या लाभार्थींना दरमहा सरकारकडून मोफत धान्य मिळते. मात्र, यातील अनेक लाभार्थी निकषांनुसार अपात्र आहेत. त्यानुसार केंद्र सरकारने जिल्हा पुरवठा अधिकारी व अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना १० ऑगस्ट रोजी अपात्र लाभार्थींच्या याद्या पाठविल्या आहेत.
यात काही लाभार्थींचे वय १०० वर्षे पूर्ण झाले, तरीदेखील ते धान्य उचलतात. काही लाभार्थींचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्याचेही आढळले आहे. या लाभार्थींबद्दल शंका आहे. काही लाभार्थी सहा ते दहा महिने झाले, रेशन दुकानातून धान्यच घेत नाहीत. धान्य न उचलणारे, वय कमी-अधिक असलेल्या लाभार्थींची तालुकास्तरावर, शहरातील नगरांमध्ये जाऊन पडताळणी केली जात आहे.
परंतु, चारचाकी वाहन असलेले, वार्षिक उत्पन्न सहा लाखांपेक्षा जास्त असलेल्यांचे धान्य बंद केले जाणार आहे. आता सर्व लाभार्थींची ई-केवायसी केली जाणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
चौकट-
जिल्ह्यातील लाभार्थींची स्थिती
शहरातील लाभार्थी
५,१९,४६३
अपात्र ठरणारे लाभार्थी
३९,१२२
ग्रामीणमधील लाभार्थी
४,२५,०९२
अपात्र ठरणारे लाभार्थी
७२,०४


No comments:
Post a Comment