विद्यार्थ्यांचे आंदोलन 'टेकओव्हर" करण्यासाठी कॉंग्रेसची धडपड!
डॉ.ऍड.संदीप ताजने यांचा घणाघात
वाशीम/नागपूर(कटूसत्य वृत्त):- महिन्याभरापासून राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या कॉक्रोज जनता पार्टीच्या नेतृत्वात देशभरातील विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलन टेकओव्हर करीत 'राजकीय मायलेज' घेण्यासाठी कॉंग्रेसची धडपड सुरू आहे, असा घणाघात बहुजन समाज पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ.ऍड.संदीप ताजने यांनी बुधवारी (ता.२२) केला. सुरक्षितच्या दृष्टिने अत्यंत संवेदनशील असलेल्या पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर मंगळवारी कॉंग्रेसकडून करण्यात आलेल्या आंदोलनातून हे प्रकर्षाने दिसून येत असल्याचे ते म्हणाले.
जंतर-मंतरवर सुरू असलेले आंदोलन जरी राजकीय हेतूने प्रेरित असले तरी विद्यार्थ्यांवर,आंदोलकांवर करण्यात आलेला अमानुष लाठीचार्ज, सोडण्यात आलेले अश्रुधुरांचे नळकांडे सरकारची प्रतिमा मलीन करणारी आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी यासंदर्भात संसदेत निवेदन सादर करून देशाला माहिती द्यावी, असे आवाहन डॉ.ऍड.ताजने यांनी केले.
राजधानी दिल्लीत जमलेला विद्यार्थी, आंदोलक हा कुठल्या एका जाती-धर्माचा-लिंगाचा अथवा राजकीय पक्षाचा नव्हता. कॉंग्रेस-भाजप एकाच्या नाणाच्या दोन बाजू आहेत. देशाला त्यामुळे हे पक्ष विरहित सरकार हवे आहे, तिसरा पर्याय आता देशाला अपेक्षित आहे, असे सध्याच्या वातावरणावरून लक्षात येत आहे. अशात अण्णा हजारे असो वा सोनम वांगचुक, यांनी सत्ताधार्यांच्या हातचे बाहुले होवू नये, असे मत डॉ.ऍड.ताजने यांनी व्यक्त केले.
अर्थात विविध न्याय मागण्यांसाठी आंदोलन हे केले जातील. मात्र आंदोलकांवर करण्यात येणाऱ्या अमानुष अत्याचाराविरोधात आवाज प्रत्येकांनी उचचला पाहिजे. २० जुलैला राजधानी दिल्ली या अमानुष अत्याचाराने हादली. ज्यांच्यावर अत्याचार झाले ते भारतीय नव्हते का? हे पंतप्रधानांनी स्पष्ट करावे. मोदी-शहांची देशभक्ती बेगडी आहे आणि राहुल गांधी यांचे वर्तन हे केवळ राजकीय स्टंटबाजी आहे, असा आरोप डॉ.ऍड.ताजने यांनी केला.अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून आम आदमी पार्टी जन्माला आली. आता सोनम वांगचुक यांच्या निमित्ताने कॉक्रोज जनता पार्टीचे बाळंतपण कोण करीत आहे? असा प्रश्न डॉ.ऍड.ताजने उपस्थित केला आहे.

No comments:
Post a Comment