नसरापूर निकालाचे स्वागत; कोपर्डी पीडितेला न्याय कधी?
सकल मराठा समाजाचा सरकारला सवाल; विलंब झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
सोलापूर (कटूसत्य वृत्त) : नसरापूर येथील अत्याचार प्रकरणाचा अवघ्या ६० दिवसांत निकाल लागून दोषीला मृत्यूपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याचे सकल मराठा समाजाने स्वागत केले आहे. मात्र, २०१६ मधील कोपर्डी अत्याचार प्रकरणाचा निकाल अद्याप प्रलंबित असल्याबद्दल सरकारला जाब विचारत, पीडितेला न्याय कधी मिळणार, असा सवाल समाजाच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.
सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोपर्डी अत्याचार प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्याची घोषणा शासनाने केली होती. मात्र, दहा वर्षांचा कालावधी उलटूनही या प्रकरणाचा अंतिम निकाल लागलेला नाही. त्यामुळे न्यायप्रक्रियेतील विलंबाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, सर्व पीडितांना समान आणि वेळेत न्याय मिळाला पाहिजे, अशी समाजाची अपेक्षा आहे.
राज्यातील विविध अत्याचार प्रकरणांतील प्रलंबित खटल्यांचा शासनाने आढावा घेऊन न्यायप्रक्रियेला गती द्यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
कोपर्डी प्रकरणाचा निकाल तातडीने लागला नाही, तर सकल मराठा समाजाच्या वतीने पुन्हा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही माऊली पवार यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment