मानेगाव गटाच्या प्रभाग कमिटीची बैठक संपन्न
ग्रामीण विकासासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाचा समन्वय आवश्यक : पृथ्वीराज सावंत
लोंढेवाडी (कटूसत्य वृत्त) : राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार तसेच केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून विविध विकासाभिमुख योजना राबविल्या जात आहेत. जिल्हा परिषद ही ग्रामीण विकासाची महत्त्वाची यंत्रणा असून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मानेगाव जिल्हा परिषद गटाचे नूतन सदस्य पृथ्वीराज सावंत यांनी केले.
मानेगाव जिल्हा परिषद गटाच्या प्रभाग कमिटीची बैठक लोंढेवाडी येथील सोनाई गार्डन हॉलमध्ये पृथ्वीराज सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत विविध विभागांच्या योजनांचा आढावा घेऊन त्या अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या.
यावेळी जनावरांचे लसीकरण, पीएम किसान योजना, बियाणे उपलब्धता, फळबाग योजना, कृषी यांत्रिकीकरण, शेततळी, ठिबक सिंचन, स्प्रिंकलर, कृषी सिंचन योजना, रोजगार हमी योजना, पाणंद रस्ते आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागातील लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश पृथ्वीराज सावंत यांनी दिले.
तसेच नदीकाठच्या परिसरात सर्पदंशाच्या घटनांचा विचार करून आवश्यक औषधांच्या उपलब्धतेचाही आढावा घेण्यात आला. आरोग्य विभागातील काही त्रुटी असल्यास त्या तातडीने दूर करून नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
बैठकीस सरपंच दत्तात्रय जाधव, रणजित पाटील, मानेगावचे सरपंच तानाजी लांडगे, लोंढेवाडीचे सरपंच संतोष लोंढे, खैरेवाडीचे सरपंच बाळासाहेब इंगळे, वडाचीवाडीचे सरपंच पांडुरंग कौलगे, माजी सरपंच रमेश भोईटे, प्रभाग कमिटीचे सचिव आकाश कोकाटे, विस्तार अधिकारी अमृत ढवळे, शाखा अभियंता कर्मवीर चव्हाण, पाणीपुरवठा विभागाचे व्यंकटेश घाटुळे, अनिल देशमुख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संदीप सावंत, संजय क्षीरसागर, पांडुरंग बोबडे, दगडू बोबडे, संजय बोबडे आणि सिद्धेश्वर माळी यांनी विशेष परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment