पर्यावरण दिनादिवशीच वादळाने वृक्ष साम्राज्यावर घाला घातला
अकलूज (विलास गायकवाड):- सर्वत्र जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, अकलूजसह माळशिरस तालुक्यातील विविध भागात पर्यावरण दिनादिवशीच, वृक्ष साम्राज्यावर धडकी भरवणाऱ्या वादळाने घाला घातला असून, काही क्षण अकलूज मधील जनजीवन विस्कळीत झाले होते. भयावह वादळामुळे अकलूजकरांचे मन सुन्न झाले होते.
शुक्रवार दिनांक 05.06.2026 रोजी, मोठ्या उत्साहामध्ये जागतिक पर्यावरण दिन, सर्वत्र साजरा करण्यात आला. अकलूज मध्ये अगदी सकाळ पासूनच सूर्याच्या प्रखरदाहकतेची कमकरता जाणवत होती. काही क्षण अचानक ढगाळ वातावरण तयार होत होते तर अचानक ऊन पडत होते. दिवसभराचे वातावरण पाहता, नक्कीच मन सुखावणारी पर्जन्यवृष्टी होईल असे वाटत होते. परंतु सायंकाळी पाच साडेपाचच्या दरम्यान, अचानक भयानक वादळ आले आणि कहरच करून गेले. काही क्षणातच त्याने अकलूजचे हिरवे साम्राज्य उध्वस्त केले. याबरोबरच, वीज पुरवठा करणाऱ्या तारेवरती वृक्षांच्या फांद्या तुटून पडल्यामुळे, वीज पुरवठा करणाऱ्या तारा, रस्त्यांवरती लोळत पडलेल्या होत्या. काही टपरी धारकांच्या टपरीवरती, दुकानांवरती, वृक्षांच्या फांद्या तुटून पडल्यामुळे काही प्रमाणात त्यांचे नुकसान झाल्याचे निदर्शनात आले. जागतिक पर्यावरण दिनादिवशीच निसर्गाचा आगळा वेगळा चमत्कार जनतेला पाहायला मिळाला.

No comments:
Post a Comment