प्रशासनाची वाट न पाहता नागरिकांनी घेतला स्वच्छतेचा पुढाकार
दौंड (कटूसत्य वृत्त):- "स्वच्छ परिसर, सुंदर परिसर" या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीत उतरवत पाटस येथील चैतन्य रेसिडेन्सीच्या फ्लॅटधारकांनी परिसर स्वच्छतेचा आदर्श उपक्रम राबविला आहे. सोसायटीच्या बाजूला मोठ्या प्रमाणात साचलेल्या कचऱ्याची जेसीबी मशीनच्या सहाय्याने साफसफाई करण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून परिसरात काही नागरिकांकडून विनाकारण कचरा टाकला जात असल्याने अस्वच्छता निर्माण झाली होती. यामुळे दुर्गंधी, आरोग्यविषयक समस्या तसेच परिसराच्या सौंदर्यावर विपरीत परिणाम होत होता. याची दखल घेत चैतन्य रेसिडेन्सीच्या रहिवाशांनी प्रशासनाची वाट न पाहता स्वतः पुढाकार घेऊन परिसर स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी रहिवाशांनी प्रशासनाकडे परिसरात कचरा व घाण करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांमुळे स्वच्छता अभियानाला बाधा येत असून अशा प्रवृत्तींना आळा घालणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. तसेच नागरिकांनीही सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून परिसरात कचरा टाकणाऱ्यांना वेळोवेळी समज द्यावी, त्यांना रोखावे आणि आवश्यक असल्यास अशा व्यक्तींचे फोटो अथवा व्हिडीओ काढून संबंधित प्रशासनाकडे तक्रार करावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. नागरिक आणि प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातूनच स्वच्छ व निरोगी परिसर निर्माण होऊ शकतो, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
चैतन्य रेसिडेन्सीच्या रहिवाशांच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात येत असून इतर नागरिकांनीही यापासून प्रेरणा घेऊन आपल्या परिसराच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याकामी हर्षद बंदीष्टी, अजिंक्य कुदांडे, ललित पुरोहित, महेश कदम, शुभम गायकवाड, प्रशांत गायकवाड, दत्तात्रय गवळी, योगेश सोनवणे,शहाजी इंगवले यांचे योगदान मिळाले.

No comments:
Post a Comment