आदिनाथ कारखाना लिलावात निघतोय हे दुर्दैवी
करमाळा(कटूसत्य वृत्त):- तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना सध्या लिलाव प्रक्रियेत अडकला असून, हा कारखाना वाचवणे हाच सध्या महत्त्वाचा प्रश्न आहे. निवडणुकीत सोन्याचा धूर काढू अशा घोषणा आमदार नारायण पाटील यांनी दिल्या होत्या, मात्र आज कारखाना त्यांच्याच नेतृत्वाखाली लिलावात निघण्याची वेळ आली आहे, हे तालुक्याचे दुर्दैव आहे, असे प्रतिपादन बारामती अॅग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी केले आहे. करमाळा येथे आयोजित पत्रकार परिषदेत गुळवे बोलत होते.
यावेळी त्यांनी आदिनाथ कारखाना, डिकसळ पुलाचे श्रेय आणि सुभाष गुळवे यांची आमदार पाटील यांच्यावर टीका तालुक्यातील वीज समस्येवरून आमदार पाटील यांच्यावर जोरदार टीका केली, तर माजी आमदार संजय शिंदे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.
कारखान्याच्या स्थितीवर बोलताना गुळवे म्हणाले की, बारामती अॅग्रोने २०२० - २१ मध्ये आदिनाथ कारखाना २५ वर्षांच्या करारावर चालवण्यासाठी घेतला होता. मात्र, या हस्तांतरात राजकीय
अडचणी आणल्या गेल्या. सध्या कोर्टाने १६ तारखेपर्यंत लिलाव प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. जर आमदार पाटील यांनी योग्य आर्थिक नियोजन करून कारखाना वाचवला, तर बारामती अॅग्रोने दाखल केलेल्या दाव्यांमधून कायदेशीर माघार घेण्यास आणि सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत. कारखाना बंद राहिल्याने कर्ज वाढले असून जेव्हा कारखाना बारामती अॅग्रोकडे देण्याचे ठरले होते,तेव्हा बॅलन्स शीटवर एनसीडीसीचे ४२ कोटी आणि एमएससी बँकेचे ६० कोटी कर्ज होते. आमदारांनी कारखाना बंद ठेवल्यामुळे आज एमएससी बँकेचे कर्ज ११० कोटींवर आणि एनसीडीसीचे कर्ज ८५ कोटींवर गेले आहे. बहुमत असताना आमदार पाटील कारखाना चालविण्यात अपयशी ठरले आहेत. त्यांच्याच चुकीच्या धोरणांमुळे आदिनाथ लिलावाच्या उंबरठ्यावर उभा आहे, असा थेट आरोप गुळवे यांनी केला आहे.
डिकसळ पुलाच्या कामावरून सुरू असलेल्या श्रेयवादावर गुळवे यांनी सांगितले की, उजनी धरणावरील डिकसळ पुलासाठी ५५ कोटींचा निधी मंजूर करून आणण्याचे आणि त्याचे डिझाइन बदलून घेण्याचे सर्व श्रेय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचेच आहे. आमदार पाटील यांनी या संदर्भात साधी बैठकही घेतली नाही, उलट पूल खचला असताना त्यांनी केवळ पाहणी करून पूल बंद
केला होता, असा दावा गुळवे यांनी केला.
No comments:
Post a Comment