इंग्रजांविरुद्ध आमचा बाप लढला; आमच्या नशिबी मात्र गुन्हेगारीचा कलंक : डॉ. अरुण जाधव
बार्शी (कटूसत्य वृत्त) : देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्त सांडणाऱ्या आणि इंग्रजांविरुद्ध संघर्ष करणाऱ्या भटके-विमुक्त समाजाच्या माथी इंग्रजांनी गुन्हेगारीचा शिक्का मारला. स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे उलटून गेली तरी हा कलंक पूर्णपणे पुसला गेला नसल्याची खंत भटके-विमुक्त समाजाचे नेते डॉ. अरुण जाधव यांनी व्यक्त केली.
भटके-विमुक्त समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच समाजाच्या हक्कांसाठी सुरू करण्यात आलेली ‘मुशाफिरी यात्रा’ गुरुवार, दि. ११ जून रोजी सोलापूर व धाराशिव जिल्ह्यात दाखल झाली. बार्शी येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. जाधव बोलत होते.
संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्क व अधिकारांबाबत जनजागृती करणे, तसेच भटके-विमुक्त समाजाची अचूक लोकसंख्या शासनाच्या नोंदीत यावी यासाठी घरगणना व स्वतंत्र जनगणना करण्याची मागणी या यात्रेतून करण्यात येत आहे. यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात बार्शी शहरातील कैकाडी, मदारी, पारधी, भिल्ल, वडार, नाथपंथी गोसावी, जोशी, वासुदेव, वैदू आदी समाजांच्या पालांवर व तांड्यांवर जाऊन जनजागृती करण्यात आली.
समाजातील शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक व राजकीय प्रश्न सोडवण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, तसेच भटके-विमुक्त समाजाची अचूक नोंद व्हावी यासाठी जनगणना आणि घरगणना ही काळाची गरज असल्याचा संदेश या यात्रेद्वारे देण्यात आला.
कार्यक्रमात मुशाफिरी यात्रेचे समन्वयक प्रा. संतोष चव्हाण, नागनाथ अडसूळ, मनीष देशपांडे आणि स्वाती ठोंगे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ऋषी गायकवाड, जाकीर तांबोळी, राजेंद्र कुलकर्णी, आनंद चव्हाण, रूक्षराज वैद्य, पठाण हैदर, राहुल चव्हाण यांच्यासह भटके-विमुक्त समाजातील अनेक बांधव उपस्थित होते.
No comments:
Post a Comment