अदृश्य शक्तीनं काम केलं म्हणूनच आम्ही 16 वरून 110 मतांवर पोचलो
शील मोहिते पाटलांचा गोरेंवर पटलवार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-आमच्याकडेच केवळ 16 च मतं होती ना. पण अदृश्य शक्तीनं काम केलं आणि आम्ही 110 पर्यंत पोचलो. जिल्ह्यातील मतदारांची विचारपूस, मानसन्मान आणि शेवटी लक्ष्मी दर्शनसुद्धा आमचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्यामुळे झाले आहे.
आम्हाला कट्टर पुरोगामी मतं मिळाली आहेत. बाकीची मतं दहशतीखाली गेली. ती दशहतीखाली गेली नसती, तर निकाल अजून वेगळा दिसला असता. 'घर बैठे तो लाचार कहलायगें, लढकर हरे तो मिसाल बन जायगें,' अशा शब्दात खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपले मत व्यक्त केले.
विधान परिषद निवडणूक निकालानंतर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज अकलूजमध्ये शिवाई वाड्यावर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी निवडणुकीतील पराभावावर तसेच अदृश्य शक्तीवर भाष्य केले. पुरोगामी विचाराच्या मतदारांनी जी मते दिली, त्यांचे आपण आभार मानतो. राजेंद्र राऊत निवडून आले त्यांचे अभिनंदन, त्यांच्याकडून निवडणूक काळात दिलेली आश्वासने पूर्ण व्हावीत, अशी सदिच्छा व्यक्त करतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मोहिते पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार ही निवडणूक आपण लढविली. ही निवडणूक लोकशाही पद्धतीने न होता प्रचंड दबाव व दहशत मतदारांवर होती, तरीही पुरोगामी विचारांच्या मतदारांनी मते दिली. त्यामुळे ज्यांनी तीन आकडी मतदान मिळणार नाही अशी वल्गना केल्या, त्यांना मतदारांनीच उत्तर दिले आहे.
मोहिते पाटील घरातील उमेदवार का दिला नाही, यावर खासदार धैर्यशील म्हणाले, विरोधक हे वातावरणानुसार बोलतात. घरातील उमेदवार दिला असता तर ते म्हणाले असते की, मोहिते पाटलांना दुसऱ्यांना पदचं द्यायची नाहीत. त्यांच्याकडे माणसंच नाहीत. त्यांना घरातच पदं पाहिजेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रदीर्घ अनुभव असलेले वसंत देशमुख यांना उमेदवारी दिली तर ते आता म्हणतात की घरातला का दिला नाही? या किरकोळ गोष्टी आहेत. त्यांना फक्त कारण पाहिजे. निवडणूक ही मोहिते पाटील केंद्रीतच झाली. त्यांना दुसऱ्या विषयावर बोलताच येत नाही. बघंल तेव्हा आमच्यावर बोलत असतात, असा टोलाही त्यांनी गोरेंना लगावला.
सोलापूर जिल्ह्यातून मोहिते पाटील घराणे संपले असल्याचे म्हणणाऱ्यांनी आपली हक्काची मते, सत्ता खासदार आमदार असताना आपल्याला एवढी धावपळ का करावी लागली याचा विचार करावा, असा टोलाही त्यांनी गोरे आणि भाजपला लगावला. राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांच्याबाबत पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील, असेही मोहिते पाटील यांनी स्पष्ट केले.
....तर निवडणूक बिनविरोध झाली असती
आपण खासदार म्हणून, डीपीडीसी सदस्य म्हणून काम केले आहे, त्या अनुभवानुसार, आज जर पालकमंत्री चंद्रकांत पाटील असते, तर त्यांनी आमच्याशी चर्चा केली असती. आम्हीही काही विकासाचे मुद्दे मांडले असते आणि विधान परिषदेची ही निवडणूक बिनविरोध झाली असती, असा दावा धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला.

No comments:
Post a Comment