विधानपरिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक तारखांची घोषणा
मुंबई (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकांची घोषणा करण्यात आली असून १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या सर्व १६ जागा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातील असून या जागांसाठी १८ जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत २५ मे ते १ जून असणार आहे, तर अर्जांची छानणी २ जून रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्याने या मतदारांतून होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकाही लांबल्या होत्या. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसांपूर्वी पार पडल्याने विधानपरिषदेच्या या १६ जागांसाठीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोणकोणत्या मतदारसंघांसाठी होणार निवडणूक?
सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर-जालना
दहा विधानपरिषद सदस्यांना शपथ
काही दिवसांपूर्वीच विधानसभा सदस्यांच्या मतदानावर होणाऱ्या विधानपरिषदेच्या ९ जागांवरील निवडणूक पार पडली. विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवड झालेले नऊ आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या एक अशा दहा सदस्यांचा शपथविधी गुरुवारी सकाळी विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात पार पडला. परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी या सदस्यांना शपथ दिली. या वेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार उपस्थित होते.
बिनविरोध निवड झालेल्या सदस्यांमध्ये भाजपचे प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे, संजय भेंडे. शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे, बच्चू कडू, शिवसेना उबाठा पक्षाचे अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दीकींचा समावेश आहे. प्रज्ञा सातव यांनी काँग्रेस पक्षातून राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक घेतली होती. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सातव यांनाच ती जागा देण्यात आली.
.png)
No comments:
Post a Comment