नवीन वाहनामुळे ग्रामीण पोलीस दलाची कार्यक्षमता अधिक वाढेल- पालकमंत्री गोरे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, May 7, 2026

नवीन वाहनामुळे ग्रामीण पोलीस दलाची कार्यक्षमता अधिक वाढेल- पालकमंत्री गोरे

 नवीन वाहनामुळे ग्रामीण पोलीस दलाची कार्यक्षमता अधिक वाढेल- पालकमंत्री गोरे 





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ग्रामीण पोलीस विभागाला विविध पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या निधीतून पोलीस विभागाने खरेदी केलेल्या वाहनामुळे पोलीस दलाची कार्यक्षमता अधिक वाढली जाणार आहे त्यामुळे पोलीस दलाने सर्वसामान्य नागरिकांना अधिक गतिमान पद्धतीने सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
    सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयात शुक्रवार, १ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजता भव्य सोहळा पार पडला. मुख्यालय येथील ओपन लॉन चे उद्घाटन, डॉरमेट्री हॉलचे भूमिपूजन तर पोलीस विभागाच्या विविध वाहनांचे लोकार्पण पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते.
    यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य,  राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे, महापौर विनायक कोंड्याल, आमदार देवेंद्र कोठे, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिदेशक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आदी उपस्थित होते.
     प्रारंभी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्हा नियोजन समितीतून वाहनासाठी 95 लाख, ओपन लॉन साठी 45 लाख तर डॉरमेट्री हॉल साठी एक कोटी 34 लाख उपलब्ध करून दिलेले आहेत अशी माहिती दिली. यामुळे पोलीस मुख्यालयाच्या अधोरेखित पायाभूत सुविधांना बळकटी मिळणार आहे.  

*ग्रामीण पोलीस दलाच्या पुढाकारातून जिल्ह्यात ऑरगॅनिक शेतीला चालना-पालकमंत्री*
         ग्रामीण पोलीस दलाच्या विशेषता पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या प्रयत्नातून सोलापूर जिल्ह्यात वृक्ष लागवडी बरोबरच ऑरगॅनिक शेतीला प्राधान्य दिले जात आहे. पोलीस विभाग जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटलांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना ऑरगॅनिक शेतीचे महत्व सांगून ती शेती करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. सध्या शेतीचे उत्पादन वाढवणे तसेच शेती पिकाला कीड लागू नये म्हणून मोठ्या प्रमाणावर रसायने फवारली जात आहेत, त्यातून कॅन्सर सारख्या आजाराचे प्रमाणात वाढ झाल्याचे निर्देशनास आलेले आहे. त्यामुळे ग्रामीण पोलीस दलाने ऑरगॅनिक शेतीला दिलेली चालना हा एक चांगला उपक्रम असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले. 
      ग्रामीण पोलीस विभागाकडून पोलीस मुख्यालयाच्या शेजारी पेट्रोल पंप चालवला जातो त्या ठिकाणी आयोजित ऑरगॅनिक भाज्या व फळांच्या स्टॉलचे उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते.
      पालकमंत्री गोरे पुढे म्हणाले की, पोलीस विभागाकडून विषमुक्त शेती करण्याचा संदेश दिला जात आहे. त्याचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेऊन सेंद्रिय शेतीकडे वळावे. त्याप्रमाणेच सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी येथे सुरू असलेल्या सेंद्रिय भाज्या व फळांच्या स्टॉलला भेट देऊन मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याचे आवाहन ही यावेळी त्यांनी केले.
      प्रारंभी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व सांगून जिल्ह्यातील शेतकरी यासाठी चांगला प्रतिसाद देत आहेत तसेच अशा शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या भाज्या व फळाला बाजारपेठ मिळावी म्हणून ग्रामीण पोलीस दलाच्या पेट्रोल पंपाच्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली असल्याचे सांगितले.
                    *******

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages