सर्वांनी स्वच्छतेचा धर्म अंगीकारावा : कुलगुरू
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- संत गाडगेबाबा महाराज यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या स्वच्छतेच्या विचारांचे स्मरण करून ते जीवनात अंगीकारणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी केले. स्वच्छतेमुळे समाजात आरोग्यदायी व सकारात्मक वातावरण निर्माण होते. त्यामुळे कुटुंब, परिसर तसेच सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहा’ अंतर्गत गुरुवारी संत गाडगेबाबा महाराज यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी कुलगुरू डॉ. महानवर बोलत होते. कार्यक्रमानंतर विद्यापीठाच्या अतिथीगृहासमोर वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमास प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, समन्वयक डॉ. गौतम कांबळे, परीक्षा विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, वित्त व लेखाधिकारी डॉ. महादेव खराडे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
समता सप्ताहाच्या निमित्ताने ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : जीवन व कार्य’ तसेच ‘महात्मा ज्योतिराव फुले : जीवन व कार्य’ या विषयांवर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमांमधून सामाजिक समतेचे मूल्य, स्वच्छतेचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे देण्यात आल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
.png)
No comments:
Post a Comment