मराठा साम्राज्याचा नकाशा वगळल्याने संताप
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात करण्यात आलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर इतिहास विषयातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळण्यात आल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांना निवेदन देण्यात आले. इतिहासाशी छेडछाड खपवून घेतली जाणार नाही, असा ठाम इशारा देत नकाशा तात्काळ पूर्ववत समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली.
महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी मोरे, हनुमंत कदम, सचिन गंगथडे, वैभव चव्हाण, सुहास निंबाळकर, मालोजी शेंबडे, संतोष जाधव, अमोल पवार, नानासो शिंदे, अमर शिंदे, शुभम ताटे, काका यादव, पांडुरंग शिंदे, श्यामराव साळुंखे, नागेश गायकवाड, प्रभावती गायकवाड, रतन थोरवत, बालाजी शिंदे, शरण साळुंखे, दीपक कोठावळे, दीपक गोरे, सुमित गाजरे, प्रज्वल घाडगे, अनिल उकरंडे आदी पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मराठा साम्राज्य हा केवळ इतिहासाचा भाग नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व राष्ट्रीय अस्मितेचा महत्त्वाचा घटक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या स्वराज्याचा विस्तार विद्यार्थ्यांना नकाशाच्या माध्यमातून समजणे आवश्यक आहे. मात्र, काही इयत्तांमधून हा नकाशा वगळल्याने विद्यार्थ्यांच्या इतिहासाच्या आकलनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
त्यामुळे शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये मराठा साम्राज्याचा नकाशा पूर्ववत व स्पष्ट स्वरूपात समाविष्ट करावा, डिजिटल माध्यमांतून नकाशाची सविस्तर माहिती उपलब्ध करून द्यावी, तसेच तज्ज्ञ समिती स्थापन करून अभ्यासक्रमाचे पुनरावलोकन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment