मुबलक पाणी असूनही शहरात विस्कळीत पुरवठा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही अनेक भागांत नागरिकांना अनियमित व विस्कळीत पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत असल्याने सत्ताधाऱ्यांवर नाराजीचा सूर उमटत आहे. वारंवार होणारे वीजपुरवठा खंडित होणे, जलवाहिन्यांमधील गळती, कमी दाबाने होणारा पुरवठा तसेच नियोजनातील त्रुटी यामुळे नागरिकांची गैरसोय वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंड्याल यांनी मंगळवार, दि. 7 एप्रिल रोजी पाणीपुरवठा विभागाची आढावा बैठक घेत अधिकाऱ्यांना चांगलाच दम भरला.
या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे आदी उपस्थित होते. बैठकीत शहरातील विविध भागांतील पाणीपुरवठ्याच्या तक्रारींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. अनेक ठिकाणी वेळेवर पाणी न येणे, काही भागांत कमी दाबाने पुरवठा होणे, तर काही परिसरात वारंवार पाणीपुरवठा खंडित होण्याचे प्रकार समोर आले. नागरिकांना नियमित पाणी मिळणे ही महापालिकेची जबाबदारी असून त्यात कोणतीही कसूर खपवून घेतली जाणार नाही, असे महापौरांनी स्पष्ट केले.
वीजपुरवठा खंडित झाला, मोटार बंद पडली, गळती झाली किंवा यंत्रणेमध्ये बिघाड झाला, अशी कारणे आता चालणार नाहीत. कोणतेही कारण न सांगता स्कॅडा प्रणालीचा वापर करत त्रुटी दुरूस्त करा अन् शहराचा पाणीपुरवठा सुरळीत झाला पाहिजे, असा स्पष्ट इशारा महापौरांनी बैठकीत दिला. बैठकीत जलवाहिन्यांमधून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गळतीचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. एका बाजूला पाणी मुबलक असताना दुसऱ्या बाजूला गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गळती तातडीने दुरुस्त करून पर्यायी यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले.

No comments:
Post a Comment