रेशन कार्डधारक केरोसीनच्या प्रतीक्षेत; गॅस टंचाईमुळे नागरिक अडचणीत
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आखाती देशांतील सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला असून, जिल्ह्यात गॅसची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. गॅस सिलिंडर बुकिंग केल्यानंतरही १० ते १५ दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याने नागरिकांच्या स्वयंपाकाची मोठी अडचण निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने केरोसीन वितरणाचा निर्णय जाहीर केला असला, तरी प्रत्यक्ष वाटप कधी सुरू होणार याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आणि प्रतीक्षा कायम आहे.
गेल्या काही वर्षांत प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि इतर उपक्रमांमुळे घराघरात एलपीजी गॅस पोहोचला. त्यामुळे केरोसीनचा वापर मोठ्या प्रमाणात कमी झाला होता. मात्र सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे पुन्हा एकदा केरोसीनची गरज भासू लागली आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी ३७ लाख ४४ हजार लिटर केरोसीन मंजूर केले असून, त्यानुसार राज्यात वितरण पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात दररोज सुमारे ७० हजार सिलिंडरची मागणी असताना केवळ २० हजार सिलिंडरचा पुरवठा होत आहे. त्यामुळे तुटवडा अधिकच तीव्र झाला आहे. दुसरीकडे, लाकडाच्या किमतीत वाढ झाल्याने पर्यायी साधनांचा वापरही महागडा ठरत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांसमोर स्वयंपाकाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
**महत्त्वाचे मुद्दे:**
* प्रति रेशन कार्ड ३ लिटर केरोसीन वाटप
* सुमारे ४५ दिवसांसाठी वितरण योजना
* ग्रामीण भागात ३.९० लाख स्टोव्हधारक, शहरी भागात ५ हजार
* गॅस पुरवठा अपुरा, मागणीच्या तुलनेत कमी उपलब्धता
केरोसीन वाटपासाठी रेशन कार्डधारक कुटुंब पात्र असणार आहेत. पांढरे रेशन कार्डधारक तसेच रेशन कार्ड नसलेल्यांना ग्रामपंचायतीचा दाखला आवश्यक राहणार आहे. स्थलांतरित मजुरांनाही ओळखपत्र सादर करणे बंधनकारक असणार आहे.
सरकारने निर्णय जाहीर केला असला तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी सुरू होणार, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागून आहे.

No comments:
Post a Comment