क्कलकोटमध्ये आजपासून अतिक्रमण हटाव मोहीम; ३०० पोलिसांचा कडक बंदोबस्त**
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- श्रीक्षेत्र अक्कलकोट शहरातील वाढत्या अतिक्रमणाच्या समस्येवर अखेर प्रशासनाने निर्णायक पाऊल उचलले असून नगरपरिषदेकडून मंगळवार, ७ एप्रिलपासून व्यापक अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात येणार आहे. विविध पथकांच्या सहभागासह संपूर्ण शहरात ही मोहीम राबविण्यात येणार असून याबाबत नागरिक व स्वामीभक्तांकडून समाधान व्यक्त होत आहे.
गेल्या काही वर्षांपासून अक्कलकोट शहर अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले आहे. रस्ते अरुंद होणे, वाहतूक कोंडी, वाहनतळाची कमतरता यामुळे नागरिकांसह भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः स्वामी समर्थ मंदिर परिसरात वाहनतळाच्या अभावामुळे भाविकांना स्मशानभूमी परिसरात वाहने लावावी लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत होती.
या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने ठोस कारवाईचा निर्णय घेतला असून मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सहभागी होणार आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य राखीव पोलीस दल, दंगा काबू पथक, शीघ्र कृतिदल, उपविभागीय पोलीस अधिकारी व स्थानिक पोलिसांसह सुमारे ३०० हून अधिक पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
अतिक्रमण हटविण्यासाठी ट्रॅक्टर, टिपर, जेसीबी, पोकलेन, डंपर आणि क्रेन यांसारख्या यंत्रसामग्रीचा वापर केला जाणार आहे. या मोहिमेद्वारे शहरातील मुख्य रस्ते, सार्वजनिक जागा आणि मंदिर परिसर अतिक्रमणमुक्त करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.
No comments:
Post a Comment