लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक संघ म्हणून कार्य करून सोलापूर जिल्ह्याचा लौकिक वाढवू या - जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- सर्व शासकीय विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी यांनी सर्वप्रथम लक्षात घ्यावे की आपण एक लोक सेवक आहोत व लोकांची सेवा करणे ही आपली प्राथमिकता आहे. लोकांची सेवा करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांमध्ये परस्पर योग्य समन्वय असला पाहिजे, त्यासाठी आपण एक संघ म्हणून कार्य करू व सोलापूर जिल्ह्याचा लौकिक वाढवू या, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित सर्व विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कार्तिकेयन मार्गदर्शन करत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, उपजिल्हाधिकारी महसूल लक्ष्मण कसेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील, अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर, वीज वितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने, समाज कल्याण च्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांच्यासह सर्व महसूल विभाग प्रमुख, इतर शासकीय विभाग प्रमुख त्याप्रमाणेच ऑनलाईन द्वारे सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्तिकेयन पुढे म्हणाले की, लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी एक टीम म्हणून पुढे आले पाहिजे. प्रत्येक शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी लोकसेवक म्हणून आपली स्वतःची प्रतिमा स्वच्छ(Clean Image) व प्रामाणिक राहील यासाठी कटीबद्ध राहावे. सोलापूर जिल्ह्याची प्रशासकीय यंत्रणा सांघिकपणे काम करणारी व उत्कृष्ट असून पुढेही असेच सहकार्य अपेक्षित राहील, असे त्यांनी सूचित केले. यावेळी त्यांनी स्वतःचा परिचय करून दिला तसेच सर्व शासकीय यंत्रणांकडून कामकाजाबाबत त्यांच्या असलेल्या अपेक्षा विशेषत: Clean Image, Loyality खूप प्राधान्य असेल, असे सांगितले. त्याप्रमाणेच लोकांसाठी काम करणाऱ्या प्रत्येक शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सोबत आपण असल्याचा विश्वासही त्यांनी दिला.
सर्व विभाग प्रमुखांच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांचे स्वागत केले व सर्व शासकीय यंत्रणा आपल्या सोबत असल्याची ग्वाही दिली.
******

No comments:
Post a Comment