अंजनगावमधील पुतळ्याचा वाद मिटण्याचे संकेत; निघणार तोडगा
माढा (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्याच्या अंजनगावमधील खेलोबा मंदिराच्या प्रवेशद्वारालगत उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात गावात गेली दोन दिवसांपासून तणावाची परिस्थिती आहे.
पुतळ्याच्या वादाप्रकरणी तोडगा निघण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुतळा बसवलेल्या जागेची मोजणी करून ती जागा सरकारी असेल तर पुतळा आहे त्याठिकाणी ठेवण्यात येईल आणि जागा खेलोबा देवस्थान ट्रस्टच्या मालकीची असेल तर पुतळा हटविण्यात येईल, असा तोडगा निघण्याचे संकेत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून अंजनगावमध्ये बुधवारपासून तणावाची परिस्थिती आहे. दगडफेक आणि तहसीलदारांची गाडी उलथवून टाकण्यात आली होती. त्यामुळे अंजनगावमध्ये स्फोटक परिस्थिती होती. मात्र, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि आमदार अभिजीत पाटील यांनी दोन्ही बाजूंशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे.
आमदार अभिजीत पाटील म्हणाले, दोन्ही बाजूंशी चर्चा केली असून आणखी काही लोकांशी चर्चा करणार आहे. प्रशासनाशी मी आता बोलत आहे. मी बुधवारी मुंबईत होतो, मी सकाळी माढ्यात आलो आहे. सकाळपासून मी सगळ्यांशी चर्चा करत आहे.
कोणताही तेढ न निर्माण होता, कोणाच्याही भावना न दुखावता योग्य त्या पद्धतीने सर्वांना विश्वासात घेऊन गावाला जे पाहिजे, जे आवश्यक आहे, त्यांचा भावनाचा आदर करून आम्ही त्यातून मार्ग काढू, असे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले.
जागेची पार्श्वभूमी काय आहे, हे समजून घेत आहे. मी काही लोकांशी चर्चा केली, आणखी काही लोकांशी चर्चा करणार आहे. आम्ही सर्वानुमते योग्य तो तोडगा काढणे गरजेचे आहे. अंजनगावात शांतता निर्माण करणे आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाणे, हे महत्वाचे आहे. लक्ष्मण हाके यांनाही विनंती आहे की, आपण सगळेजण मिळून एकत्रितपणे यावर तोडगा काढूया.
असा निघणार तोडगा
जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि आमदार अभिजीत पाटील यांनी दोन्ही समाजाशी चर्चा केली आहे. पुतळा बसवलेली जागा कोणाची आहे, हे तपासले जाईल, त्या जागेची मोजणीही करण्यात येणार आहे. जागा खेलोबा देवस्थानची असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्यात येईल आणि जागा सरकारी मालकीची असेल तर पुतळा आहे त्या ठिकाणी ठेवण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

No comments:
Post a Comment