यूट्यूबर मुकेश मोहन यांच्यावर ५० कोटींचा नोटीस; सरकारविरोधात बोलणाऱ्यांना गप्प करण्याचा प्रयत्न – प्रकाश आंबेडकर यांचा घणाघात
पुणे(कटूसत्य वृत्त):- आंबेडकरवादी यूट्यूबर मुकेश मोहन यांच्यावर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी ५० कोटी रुपयांचा मानहानीचा नोटीस बजावल्याच्या प्रकरणावरून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
आंबेडकरवादी विचार मांडणारे यूट्यूबर मुकेश मोहन यांनी ‘कारवाँ’ मॅगझिनमधील एका लेखावर आधारित व्हिडिओ तयार केला होता. या व्हिडिओमध्ये भाजपचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या बीफ एक्सपोर्टशी संबंधित कंपनीचा उल्लेख करण्यात आला होता. या व्हिडिओनंतर संतप्त झालेल्या गडकरी यांनी थेट ५० कोटी रुपयांचा मानहानीचा नोटीस पाठवला असल्याचे समोर आले आहे. याचबरोबर पोलिसांनी मुकेश मोहन यांचा मोबाईल फोनही जप्त केल्याची माहिती आहे.
या संपूर्ण घटनेवर प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र शब्दांत सरकारवर हल्ला चढवला. “सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्यांना धमकावणे, त्यांचे सोशल मीडिया अकाउंट बंद करणे आणि दडपशाही करणे, हे प्रकार आता देशभरात वाढत आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
तसेच, “लोकशाहीत सरकारची टीका करणे हा नागरिकांचा अधिकार आहे. मात्र, सत्ताधारी यंत्रणा हा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते लोकशाहीसाठी धोकादायक आहे,” असा इशाराही त्यांनी दिला.
या प्रकरणात वंचित बहुजन आघाडी मुकेश मोहन यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे स्पष्ट करत, “आम्ही या दडपशाहीचा निषेध करतो आणि सत्य मांडणाऱ्यांसोबत खंबीरपणे उभे राहू,” अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आहे.
या घटनेमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, पत्रकारिता आणि सोशल मीडिया स्वातंत्र्याबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

No comments:
Post a Comment