खत कंपन्यांनी युरिया व डीएपी खताचा 100 टक्के संरक्षित साठा ठेवणे बंधनकारक - जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- खरीप हंगाम 2026 साठी सोलापूर जिल्ह्याचा खत संरक्षित साठा 10 हजार 600 मेट्रिक टन इतका करण्यात आलेला आहे. यामध्ये युरिया 9 हजार 350 मेट्रिक टन व डीएपी 1 हजार 250 मेट्रिक टन आहे. तरी खत कंपन्यांनी सोलापूर जिल्ह्याचा खतांचा बफर स्टॉक 100% ठेवावा. या स्टॉकमध्ये कोणत्याही परिस्थितीत कमतरता होणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समिती आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कार्तिकेयन बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी हरी हावळे, जिल्हा विपणन अधिकारी मनोज वाजपेयी, इफको खत कंपनीचे रवींद्र मोरे, इंडियन पोटॅश कंपनीचे ओंकार रनवरे, नॅशनल फर्टीलायझर कंपनीचे पवनलाल हुकरे, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्सचे सागर कांबळे यांच्यासह आणि सर्व संबंधित अधिकारी व खत व बियाणे कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्तिकेयन पुढे म्हणाले की मागील वर्षीच्या खरीप हंगामात खत कंपन्यांनी बफर स्टॉक फक्त 54% ठेवलेल्या होता. त्यामुळे यावर्षी पुणे येथील कृषी आयुक्तालयचे निविष्ठा संचालक यांनी सोलापूर जिल्ह्यासाठी जेवढा खताचा
संरक्षित साठा उपलब्ध करून दिलेला आहे, तेवढा शंभर टक्के साठा संरक्षित ठेवला पाहिजे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
त्याप्रमाणेच सर्व खत कंपन्यांनी व बियाणे कंपन्यांनी कोणत्याही प्रकारचे लिंकिंग न करता खते व बियाण्याची विक्री शेतकऱ्यांना करावी याबाबती त कोणत्याही प्रकारची तक्रार आल्यास किंवा कृषी विभागाच्या पथकांना तसे आढळून आल्यास संबंधित कंपन्यावर अत्यंत कठोर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल असेही निर्देश जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिले. तसेच खत कंपन्यांनी त्यांचे सोलापूर येथे रॅक पॉईट तयार केले पाहिजे. तसेच जेवढा खतांचा साठा सोलापूर जिल्ह्यासाठी येणार आहे त्याचे सम प्रमाणात जिल्ह्यात सर्वत्र वितरण झाले पाहिजे त्याचे नियोजन सूक्ष्मपणे करावे आणि खत कंपन्याकडून किमान तीन ते चार दिवस अगोदर रॅक पॉईंट उपलब्ध होणार आहे, याची माहिती कृषी विभागाला द्यावी, असेही त्यांनी निर्देशित केले.
प्रारंभी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी सांगितले की, सोलापूर जिल्ह्याच्या पीक पद्धतीत मागील काही वर्षात बदल होत आहे. तसेच खरिपाच्या पीक क्षेत्रात ही वाढ होत आहे. सोयाबीन ऊस, तूर, उडीद व मका या पिकांची वाढ झालेली आहे. सोलापूर जिल्ह्यात खतांचा विषय अत्यंत संवेदनशील आहे. तसेच कृषी निविष्ठा विक्रेत्यांमध्ये खते विक्रेते 3,110, बियाणे विक्रेते 3027 आणि कीटकनाशके विक्रेते 2930 इतके असून जवळपास दहा ते बारा खत कंपन्याकडून सोलापूर जिल्ह्याला खतांचा पुरवठा होत असतो असेही त्यांनी सांगितले.
खरीप हंगाम 2026 मध्ये युरिया डीएपी एम ओ पी एस एस पी संयुक्त खते अशी एकूण मागणी दोन लाख 95 हजार 56 मीटिंग इतकी असून दोन लाख 51 हजार 958 प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. निविष्ठा व गुण नियंत्रक संचालक यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्याला दहा हजार सहाशे मेट्रिक टन खताचा बफर स्टॉक मिळाल्याचे भोसले यांनी सांगून खरीप हंगामासाठी बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचेही त्यांनी म्हटले.
यावेळी खत कंपन्यांच्या प्रतिनिधी कडून जिल्ह्याला मिळाला बफर स्टॉक 100% ठेवण्यात येईल असे सांगितले तर महाबीज कंपनीकडून मुबलक प्रमाणात बियाणे उपलब्ध करून मिळतील असे सांगितले तर वितरक असोसिएशन च्या वतीने जिल्ह्यातील अकरा तालुक्यांना सम प्रमाणात खत पुरवठा होत नसल्याबाबत सांगून सोलापूर येथे खत कंपन्यांनी रॅक पॉइंट तयार करण्याबाबत मागणी केली.
.png)
No comments:
Post a Comment