अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्या : प्रणिती शिंदे
मोहोळ (कटूसत्य वृत्त) – सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या मोठ्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर Praniti Shinde यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित करत शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.
मंगळवार व बुधवारी सलग दोन दिवस झालेल्या गारपिटीमुळे द्राक्ष, डाळिंब, केळी, हरभरा, पेरू, कांदा, खरबूज तसेच गुलाब या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याशिवाय भाजीपाला व फळबागांनाही मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी पंचनामे अद्याप पूर्ण झाले नसल्याने शेतकऱ्यांना मदत मिळण्यात विलंब होत असल्याचे त्यांनी संसदेत नमूद केले.
तसेच पश्चिम आशियातील संघर्षामुळे होर्मुज सामुद्रधुनी मार्गावरील आयात-निर्यात विस्कळीत झाल्याने शेतीमाल अडकून पडत आहे. व्यापाऱ्यांकडून खरेदीला टाळाटाळ होत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान वाढत आहे. याशिवाय कांद्याच्या निर्यातीवरील बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकरी अधिकच अडचणीत सापडले आहेत.
शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणी लक्षात घेऊन केंद्र व राज्य सरकारने तातडीने निर्णय घेऊन नुकसानग्रस्तांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिंदे यांनी केली.
दरम्यान, मोहोळ तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी शिंदे यांच्या पथकाने शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेत सविस्तर माहिती गोळा करण्यात आली असल्याची माहिती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुलेमान तांबोळी यांनी दिली.
No comments:
Post a Comment