सांगोला (कटूसत्य वृत्त):- तालुक्यात ज्वारी लागवड कमी झाल्याने कडब्याचा तुटवडा निर्माण झाला असून दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या कडब्याचे दर प्रति शेकडा २५०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे पशुपालकांना चाऱ्यासाठी जादा खर्च करावा लागत असून शेतकऱ्यांवर आर्थिक ताण वाढला आहे.
बदलत्या हवामानाचा परिणाम आणि अधिक उत्पादनक्षम पिकांकडे वाढलेला कल यामुळे रब्बी हंगामात शेतकरी ज्वारीऐवजी मक्याकडे वळताना दिसत आहेत. अतिवृष्टीत तग धरण्याची क्षमता, हिरवा व सकस चारा उपलब्ध होणे तसेच लागवडीपासून काढणीपर्यंत यांत्रिकीकरणाच्या सोयीमुळे मका पिक शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर ठरत आहे.
गेल्या काही वर्षांत सुधारित बियाणे, ठिबक सिंचन आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे मक्याच्या हेक्टरी उत्पादन क्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे. परिणामी पारंपरिक ज्वारी व बाजरी लागवडीत घट होत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, ज्वारी क्षेत्र घटल्याने कडब्याचा पुरवठा कमी झाला आहे. इंधन दरवाढीमुळे चाऱ्याच्या वाहतुकीचा खर्चही वाढला असून बाहेरून कडबा आणताना प्रति ट्रिप अधिक भाडे द्यावे लागत आहे. ज्वारी पिके हवामानावर अवलंबून आणि नाजूक असल्याने उत्पादनात घट येते. शिवाय कापणी व मळणी प्रक्रिया किचकट व खर्चीक असल्याने शेतकरी पर्याय शोधत आहेत.
पक्ष्यांचा वाढता उपद्रवही ज्वारी उत्पादनासाठी मोठे आव्हान ठरत आहे. त्यामुळे कमी जोखीम, अधिक उत्पादन आणि यांत्रिकीकरणाच्या सोयीमुळे मक्याला प्राधान्य मिळत असून त्याचा थेट परिणाम कडब्याच्या दरवाढीत दिसून येत आहे.
No comments:
Post a Comment