अवकाळीचा कहर; शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- तालुक्यात सोमवारी दुपारनंतर झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना मोठा फटका बसला. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
सादेपूर, निम्बर्गी, विंचूर, कुसुर, खानापूर, तेलगाव आदी गावांमध्ये वादळी पावसामुळे शेतातील पिके आडवी झाली. कलिंगड, गहू, ज्वारी, कांदा, आंबा आणि द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दुपारनंतर अचानक वादळी वाऱ्यासह पावसास सुरुवात झाल्याने वातावरणाचा नूर पालटला. सर्वत्र धुळीचे लोळ उठले होते. काढणीला आलेली गहू व ज्वारी पिके वाऱ्यामुळे आडवी झाली. द्राक्ष बागांना मोठा फटका बसला असून आंबा बागांतील कैऱ्या गळून पडल्या आहेत.
आधीच हमीभावाच्या विवंचनेत अडकलेल्या शेतकऱ्यांवर आता आस्मानी संकट कोसळल्याने दुहेरी आर्थिक संकट ओढावले आहे. स्थानिक प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

0 Comments