Hot Posts

6/recent/ticker-posts

परिपूर्ण तयारीसह विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेस सामोरे जावे- राजेंद्र गुंड

 परिपूर्ण तयारीसह विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेस सामोरे जावे- राजेंद्र गुंड





माढा (कटूसत्य वृत्त):- शालेय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने 10 वीची बोर्ड परीक्षा हा आयुष्यातील एक महत्त्वाचा व निर्णायक टप्पा आहे.स्पर्धेच्या युगात उच्च ध्येय गाठणे हे जरी आव्हानात्मक असले तरी ते गाठण्यासाठी सुरुवातीपासूनच क्रमिक पुस्तके व इतर पूरक दर्जेदार साहित्याचे शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वाचन करून लेखनाचा भरपूर सराव करावा. अभ्यासात एकाग्रता व स्मरणशक्ती वाढावी यासाठी दररोज व्यायाम,योगासने व विविध मैदानी खेळावेत. आरोग्य निरोगी राहण्यासाठी संतुलित,पौष्टिक व सकस आहार घ्यावा.मनात परीक्षेची अनावश्यक भिती न बाळगता पूर्ण तयारीनिशी परीक्षेस आत्मविश्वासाने सामोरे गेल्यास यश हमखास मिळते असे प्रतिपादन विठ्ठलवाडीचे आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांनी केले.

ते वाकाव ता.माढा येथील श्री संत माणकोजी महाराज प्रशालेतील इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
प्रास्ताविक मुख्याध्यापक औदुंबर शेंडगे यांनी केले.

पुढे मार्गदर्शन करताना राजेंद्र गुंड यांनी सांगितले की,सध्याचे युग आधुनिक तंत्रज्ञान व मोबाईलचे आहे तेंव्हा त्याचा वापर गरजेनुसार करावा. आयुष्यात चांगले मित्र व माणसे जोडली पाहिजेत. परीक्षेच्या वेळी स्वतःवर विश्वास ठेवून निर्धारित वेळेत पूर्ण पेपर सोडवावा.वाईट विचारी व व्यसनी लोकांपासून कायमचे दूर रहावे.शिक्षक व आई-वडीलांनी दिलेले ज्ञान, माहिती,तंत्रज्ञान,कौशल्य व संस्कार आयुष्यभर जपावेत. त्या शिदोरीच्या जोरावर प्रयत्नांची पराकाष्ठा करून आयुष्याचे उच्च ध्येय गाठावे. जीवनात कितीही मोठे झालात तरी आई-वडीलांना कधीच विसरू नका असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी प्रशालेतील इयत्ता 10 वीचे विद्यार्थी साक्षी पवार व विराज पवार आणि वर्गशिक्षक सौदागर गव्हाणे,मदन डोईफोडे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष रणजित बोधले,माजी सरपंच शिवाजी भोगे,मुख्याध्यापक औदुंबर शेंडगे,कवयित्री सई लोंढे, सौदागर गव्हाणे,दादा भोगे, प्रविणकुमार बोधले,मदन डोईफोडे,राजन बरबडे,अमोल पारडे,संजय लोंढे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments