महाराष्ट्राचा विकासपुरुष हरपला, खरंच आमचा बाप माणूस गेला- नगरसेवक किसन जाधव
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात विकासाचा दूरदृष्टीकोन घेऊन चालणारा, कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा आणि संपूर्ण राज्याला कुटुंब मानणारा नेता आज हरपला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रूपाने आम्ही केवळ एक नेता नाही, तर आमचा बाप माणूस गमावला आहे, अशी अत्यंत भावनिक प्रतिक्रिया नगरसेवक किसन जाधव यांनी व्यक्त केली बुधवारी सकाळी बारामती विमानतळावर झालेल्या विमान अपघातात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन झाल्याची बातमी समजताच संपूर्ण देशासह महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक चाणक्य, दूरदृष्टी असलेला आणि विकासाची घोडदौड अविरत सुरू ठेवणारा नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. नगरसेवक किसन जाधव पुढे म्हणाले की, अजित पवार हे केवळ पदावरचे नेते नव्हते, तर कार्यकर्त्यांना बळ देणारे, विश्वास देणारे आणि वेळप्रसंगी कुटुंबप्रमुखासारखी जबाबदारी घेणारे नेतृत्व होते. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत सक्रिय कार्यकर्ता असताना तसेच सोलापूर जिल्हा नियोजन समितीचा सदस्य म्हणून काम करत असताना, केवळ आणि केवळ अजित पवार यांच्या कृपा व आशीर्वादामुळेच ही जबाबदारी निभावू शकलो. प्रभाग क्रमांक २२ च्या विकासासाठी त्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. विकासकामांच्या बाबतीत त्यांनी कधीही नकार दिला नाही. एक आपुलकीचा, कुटुंबातील सदस्याप्रमाणे माझ्याशी त्यांचे नाते होते. त्यामुळे आज निर्माण झालेली ही पोकळी कधीही भरून निघणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात असा नेता पुन्हा होणार नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आज घरातला कुटुंबप्रमुखच हरपल्यासारखं वाटत आहे. त्यांच्या प्रेमावर, विश्वासावर आणि मार्गदर्शनावर आम्ही उभे होतो. त्यांच्या विकासात्मक धोरणांवरच आजपर्यंत काम केलं आणि पुढील काळातही त्यांच्याच दूरदृष्टीच्या विचारांनी काम करत राहू, असे सांगताना किसन जाधव यांचे मन दुःखाने भरून आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मी खूप जवळून पाहिले. माझ्यावर त्यांचे विशेष प्रेम व विश्वास होता. त्यांचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मी नेहमी प्रामाणिकपणे काम केले. त्यांचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहतील, असा भावनिक विश्वासही त्यांनी व्यक्त केला. खरंच, आज आमचा बाप माणूस निघून गेला आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी जाधव–गायकवाड आणि इछा भगवंताची परिवाराच्या वतीने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
.png)
0 Comments