महापौरपदाच्या शर्यतीत अनेकजण दोन्ही देशमुखांना डावलून गोरे–कोठेच ठरविणार; पण अंतिम बोट मुख्यमंत्र्यांकडे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महापालिकेचे ३७ वे महापौरपद यंदा सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित झाल्याने भाजपमध्ये अंतर्गत हालचालींना चांगलाच वेग आला आहे. गुरुवारी मुंबईत काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत मागील दोन टर्म महिलांसाठी राखीव असलेले महापौरपद यावेळी खुले झाल्याने अनेक दिग्गज नगरसेवकांनी या पदाकडे डोळे लावले आहेत. महापौरपदाच्या शर्यतीत सध्या पाच नावे आघाडीवर असून, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडूनच नाव निश्चित होणार असले तरी अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिकेत भाजपचे सर्वाधिक ८७ नगरसेवक निवडून आले असून, त्यापैकी तब्बल ६० नगरसेवक प्रथमच निवडून आलेले आहेत. आजवर महापौरपदाचा मान अनुभवी, सभागृह चालविण्याचा कस असलेल्या नगरसेवकालाच देण्यात आला आहे. त्यामुळे या ८७ पैकी केवळ २७ अनुभवी नगरसेवकांमधूनच महापौर ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
पाच नावांची जोरदार चर्चा
सध्या महापौरपदासाठी विनायक कोंड्याल, डॉ. किरण देशमुख, नरेंद्र काळे, अनंत जाधव आणि रंजिता चाकोते ही पाच नावे चर्चेत आहेत. विशेष म्हणजे, आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख या दोन्ही देशमुख गटांतील उमेदवार असतानाही, अंतिम निर्णय स्थानिक पातळीवर न होता गोरे–कोठे गटाच्या शिफारशीवर आणि मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेवरच होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
विनायक कोंड्याल
सलग चार वेळा निवडून आलेले विनायक कोंड्याल हे यंदा १४ हजार मतांच्या विक्रमी फरकाने विजयी झाले आहेत. आमदार देवेंद्र कोठे यांचे भावजी अशी ओळख असलेल्या कोंड्याल यांचे वडील रामकृष्ण कोंड्याल हे पद्मशाली ज्ञाती संस्थेचे ट्रस्टी असून समाजातील वाद मिटविण्यात पंच म्हणून परिचित आहेत. ज्येष्ठ आणि अनुभवी नगरसेवक म्हणून भाजप नेतृत्व त्यांच्यावर शिक्कामोर्तब करू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
डॉ. किरण देशमुख
सलग दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेले डॉ. किरण देशमुख हे सलग पाच वेळा भाजपचे आमदार असलेले विजयकुमार देशमुख यांचे पुत्र आहेत. लिंगायत समाजात त्यांचा दबदबा असून भाजप युवा संघटनेतील कामाचा अनुभव ही त्यांची जमेची बाजू मानली जाते. आमदार सुभाष देशमुख गटाकडून त्यांच्या नावाला संमती मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.
नरेंद्र काळे
भाजप शहराध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते पदाचा अनुभव असलेले नरेंद्र काळे हे दुसऱ्यांदा नगरसेवक झाले आहेत. धनगर समाजातून आलेले, उच्चशिक्षित आणि निष्ठावंत कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. आजवर धनगर समाजाला महापालिकेच्या सत्ताकेंद्रात फारशी संधी मिळाली नसल्याने, सामाजिक समीकरणाच्या दृष्टीने त्यांचे नाव महत्त्वाचे मानले जात आहे. भाजपमधील तीनही गटांशी समन्वय साधण्याची क्षमता हा त्यांचा मोठा प्लस पॉईंट मानला जातो.
अनंत जाधव
दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले अनंत जाधव हे मराठा समाजातून आलेले भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ता आहेत. कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील तसेच आमदार विजयकुमार देशमुख यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. १९९२ नंतर मराठा समाजाला महापौरपद न मिळाल्याचा मुद्दा पुढे करत मराठा संघटना त्यांच्या नावासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे.
रंजिता चाकोते
पहिल्यांदाच नगरसेविका झाल्या असल्या तरी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी असलेला थेट संपर्क ही त्यांची मोठी ताकद आहे. अक्कनबळग महिला मंडळाच्या माध्यमातून त्यांनी लिंगायत समाजातील महिलांचे संघटन उभे केले आहे. लिंगायत समाजातील महिलेला संधी या मुद्द्यावर त्यांचे नाव चर्चेत असून, राजकीय वारसा लाभलेले कुटुंब हेही त्यांच्या बाजूने जाऊ शकते.
उपमहापौरपदासाठी अनुत्सुकता
महापालिकेत उपमहापौर झाले की पुढील निवडणुकीत तो नगरसेवक म्हणून निवडून येत नाही किंवा त्याचे राजकारण संपते, अशी धारणा अनेक नगरसेवकांमध्ये आहे. त्यामुळे यंदा उपमहापौरपदाच्या चर्चेपासून इच्छुक मंडळी जाणीवपूर्वक दूर राहात असल्याचे चित्र आहे.
समाजसमीकरणे ठरणार निर्णायक
भाजपने २०१७ नंतर पहिल्या अडीच वर्षांत लिंगायत समाजातील शोभा बनशेट्टी यांना, तर नंतर पद्मशाली समाजातील श्रीकांचना यन्नम यांना महापौरपदाची संधी दिली होती. आता पुन्हा पद्मशाली समाजातील नगरसेवकाला संधी द्यायची का, यावरून पक्षांतर्गत वाद होण्याची शक्यता आहे. हा वाद टाळण्यासाठी महापौर, उपमहापौर, सभागृह नेता, स्थायी समिती सभापती व परिवहन समिती सभापती या पाच पदांचे सामाजिक संतुलन साधून वाटप करण्याचा फॉर्म्युला भाजप नेतृत्व वापरू शकते, अशी चर्चा आहे.
निर्णय दिल्ली–मुंबईतच
महापौर निवडीचा अधिकार स्थानिक पातळीवर नसल्याचे स्पष्ट करताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी, “आमचे वरिष्ठ नेते, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण निर्णय घेतील,” असे सांगितले.
आमदार देवेंद्र कोठे यांनीही, “इच्छुक नगरसेवकांची नावे पालकमंत्र्यांकडे सादर केली जातील. अंतिम निर्णय वरिष्ठांकडूनच येईल,” असे स्पष्ट केले.
महापौरपदाच्या या निवडीमुळे सोलापूर भाजपमधील गटबाजी, समाजसमीकरणे आणि नेतृत्वाची दिशा स्पष्ट होणार असून, शेवटचा शब्द मुख्यमंत्र्यांचाच असणार हे आता निश्चित झाले आहे.
0 Comments