खासदारांचे संसद भवन परिसरात सरकार विरोधात तीव्र निदर्शने
नवी दिल्ली (वृत्त सेवा):-
सोलापूर जिल्हासह महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे हजारो शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असतानाही मदत मिळत नसल्याने असंतोष तीव्र होत आहे.
अतिवृष्टीमुळे पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली, अनेक ठिकाणी जमीनच वाहून गेल्याने शेतकऱ्यांवर अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. अशा गंभीर परिस्थितीत महाराष्ट्र सरकारकडून केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठविल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, कृषीमंत्र्यांनी सभागृहात दिलेल्या उत्तरात महाराष्ट्र सरकारकडून प्रस्तावच आलेला नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे मदतीची अपेक्षा ठेवून बसलेल्या शेतकऱ्यांची प्रचंड फसवणूक झाल्याचे चित्र उभे राहिले आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीची, योग्य आणि पुरेशी मदत देण्याची मागणी करत खासदार प्रणिती शिंदे आणि महाराष्ट्रातील काँग्रेसच्या खासदारांनी आज नवी दिल्ली संसद भवन परिसरात जोरदार आंदोलन केले. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारने तत्काळ निर्णय घेऊन दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

No comments:
Post a Comment