दक्षिण सोलापूर (कटूसत्य वृत्त):- गेल्या अनेक वर्षापासून आपण समाजसेवेत असून जळीतग्रस्तांना मदत करणे हे आमचे कर्तव्यच आहे. त्यामुळे निरवणे कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी एम.के. फाउंडेशन
पुढेही ठामपणे सोबत राहील, अशी ग्वाही एम. के. फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे यांनी दिली.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथील मारुती निरवणे यांच्या घराला अचानक लागलेल्या भीषण आगीत घरासह सर्व संसारोपयोगी साहित्य, सोन्याचे दागिने, साठवलेले पैसे आणि इतर मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्या. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती गावातील
प्रतिष्ठित नागरिक श्रीकांत घरले यांनी दिली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच एम. के. फाउंडेशनचे संस्थापक कोगनुरे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी निरवणे कुटुंबीयांना भेटून सांत्वन केले आणि आगीची माहिती प्रत्यक्ष जाणून घेतली. कष्टाने उभारलेला संसार काही क्षणांत राख झाल्याने कुटुंबीयांची मानसिक अवस्था अत्यंत दुःखद् असल्याचे त्यांनी पाहिले. मारुती निरवणे यांच्या चिरंजीवांशी संवाद साधताना त्यांच्या डोळ्यातील वेदना उपस्थितांना जाणवली.
जीवितहानी टळल्याने ग्रामदैवताचे आभार मानण्यात आले. तसेच वेळीच माहिती देऊन मदतकार्य सुरू करण्यास हातभार लावणाऱ्या गावकऱ्यांचे कौतुक करण्यात आले. दरम्यान, या घटनास्थळी निरवणे कुटुंबीयांसह पंचक्रोशीतील शेतकरी, गावातील मान्यवर, हितचिंतक आणि एम. के. फाउंडेशनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments