काँग्रेसला जिल्हाध्यक्ष मिळेना उमेदवार कसे मिळणार ?
भाजप- शरद पवार राष्ट्रवादीमध्येच सामना !
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सुरू होणार असल्याने सत्तेपासून दुरावलेल्या कार्यकर्त्यांचा उत्साह संचारला आहे. जिल्ह्यात सध्या भाजपचे पाच, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे चार आमदार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचा एक आणि शेकापचा एक आमदार आहे. जिल्ह्यात भाजप आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची ताकद जवळपास समान असल्याने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाविरुध्द शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच सामना होणार असल्याचे सध्याचे तरी चित्र आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेत मार्च २०२२ पासून प्रशासकराज सुरू आहे. आता न्यायालयाच्या निकालानंतर निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने महापालिका, नगरपालिकांपाठोपाठ जिल्हा परिषदेचाही प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केल्याने ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये निवडणुकीची
रणधुमाळी सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पक्षाचे प्रामाणिकपणे काम केलेल्या कार्यकर्त्यांच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची मोहोळ, माढा व करमाळा या तालुक्यात बऱ्यापैकी वर्चस्व आहे. राष्ट्रवादी अजितदादा गटाचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता.
तेव्हापासून अजितदादांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद रिक्तच आहे. दरम्यानच्या काळात सोलापूरच्या संपर्कमंत्रिपदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःकडे घेतली. परंतु निवडीनंतर पक्ष संघटनेच्या कामासाठी त्यांचा जिल्ह्यात एकही दौरा झाल्याचे ऐकिवात नाही. आता जिल्हा परिषदेच्या
निवडणुकीपूर्वी त्यांच्या पक्षाला नवीन जिल्हाध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे.
शिवसेना ठाकरे गट व शिंदे गटाची ताकद नगण्य असल्याने त्यांच्या वाट्याला फारशा जागा येतील असे वाटत नाही. दरम्यान, अक्कलकोट येथील माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे आणि करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्यापाठोपाठ आता उत्तर सोलापूर
तालुक्याचे नेते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे हेही शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात काही प्रमाणात शिंदे गटाची ताकद वाढताना दिसत आहे.
दुसरीकडे डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्तच आहे. कार्याध्यक्ष असलेले मंगळवेढ्याचे अॅड. नंदकुमार पवार यांच्यावर प्रभारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. काँग्रेसचे निरीक्षक मोहन जोशी यांनी जिल्हाध्यक्षपदासाठी व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. यासाठी काही नावे पुढे आली. परंतु जोशी यांना हवा तसा अध्यक्ष मिळत नसल्याने त्यांची गोची झाली आहे. पंढरपूरचे भगीरथ भालके यांच्या नावाची चर्चा होती. परंतु त्यांनी नकार दिल्याचे सांगण्यात येते. आता तर त्यांनी शिंदे गटाची वाट धरल्याचे बोलले जात आहे. जिल्हाध्यक्ष न मिळणे ही काँग्रेससाठी नामुष्की आहे.
माळशिरस, माढा, मोहोळ आणि करमाळ्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यामुळे साहजिकच तेथे त्यांची ताकद असणार आहे. त्यानंतर दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि पंढरपूर येथे भाजपचे आमदार आहेत. भाजपचे दोन आमदार शहरी भागातील असल्याने त्यांचा जिल्हा परिषदेवर फारसा प्रभाव दिसणार नाही. बार्शीत शिवसेना ठाकरे गटाचा तर सांगोल्यात शेकापचा आमदार आहे. त्यामुळे तेथे बऱ्यापैकी त्यांची ताकद असणार आहे. अक्कलकोटला भाजपचा आमदार असला तरी माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे हे शिवसेना शिंदे गटात गेल्याने तेथेही आता समसमान जागा येतील, असे चित्र आहे. काही झाले तरी जिल्हा परिषदेची लढत ही भाजपविरूध्द शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतच होईल, हे निश्चित आहे.
0 Comments