सोलापूर बाजार समितीत गुरुवारपासून सायंकाळीही होणार भाजीपाल्याचे लिलाव
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शेतकऱ्यांच्या भाजीपाला लिलाव दररोज सकाळी होत असल्याने खरेदीसाठी व्यापारी व विक्रेत्यांची मोठी गर्दी बाजार समितीच्या आवारात होते यात शेतकऱ्यांची गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी गुरूवारपासून सकाळी व सायंकाळी ६.३० वाजता भाजीपाला लिलाव दोन वेळा करण्याचा निर्णय सभापती दिलीपराव माने यांनी घेतला आहे.
ते पुढे म्हणाले, या निर्णयामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची सोय होणार आहे. शेतकऱ्यांच्या जिवावर आपला व्यापार असून, चोरीचे प्रकार रोखण्यासाठी प्रत्येक गाळेधारकांनी सीसीटीव्ही बसवणे गरजेचे आहे. इलेक्ट्रॉनिक काट्याचा वापर, योग्य वजन, वेळेत बिलाची रक्कम दिल्यास बळीराजाचा विश्वास वाढेल याची जाणीव ठेवली तर तुम्हालाही व्यवसायात समाधान मिळेल. असे असे मत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी व्यक्त केले.
सभापती माने यांनी मंगळवारी पहाटे ५.३० वाजता पुन्हा अचानक भेट देवून सर्व विभागांत दुचाकीवर फिरुन पाहणी केली. मात्र याची कल्पना खुद्द कर्मचाऱ्यांना देखील नव्हती. यावेळी शेतकरी, आडते देखील अवाक झाले.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी दिलीप माने हे सभापती झाल्यापासून मार्केट कमिटीत शिस्त लागली आहे असे सांगीतले.
चौकट
दोघा-चौघांमुळे आमच्या पोटावर मारू नका
आपले निकष, नियम, पाळून वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेवु, चोरीचा माल दिसून आल्यास कारवाई करा, मात्र दोघा-चौघाच्या चुकीची शिक्षा आम्हाला नको, असे रिक्षाचालकांनी माने यांना भेटून सांगितले. यावेळी माने यांनी विचारपूर्वक योग्य निर्णय घेवू असे आश्वासन रिक्षा चालकांना दिले.
0 Comments