Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळ : अवकाळीमुळे शेतीचे बाधित शेतकरी व दोन कोटी रुपयांचे नुकसान

 मोहोळ : अवकाळीमुळे शेतीचे बाधित शेतकरी व दोन कोटी रुपयांचे नुकसान

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मे महिन्यात मान्सूनपूर्व पावसाने मोहोळ तालुक्याला झोडपून काढले होते. या पावसाबरोबरच आलेल्या वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्याचे काम आता पूर्ण झाले असून विविध फळे व पिकांचे जवळपास दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती तहसीलदार सचिन मुळीक यांनी दिली. 


मागील महिन्याभरापासून तालुक्यातील पापरी, आष्टी, शेटफळ, तेलंगवाडी, सिद्धेवाडी, घोडश्वर (बेगमपूर), अरबळी, मिरी, येणकी, वाघोली, परमेश्वर पिंपरी, कामती, कुरुल, सय्यद वरवडे, अंकोली, टाकळी सिकंदर, पाटकूल, पेनूर तसेच तालुक्याच्या पूर्व भागातील सावळेश्वर, पोफळी, गोटवाडी,

रामहिंगणी, वडवळ, लांबोटी, शिरापूर, आष्टी, भांबेवाडी, हिंगणी (नि), नरखेड, देगाव, वाळूज, मनगोळी, भैरववाडी, एकूरके, यल्लमवाडी, मसले चौधरी, डिकसळ, भोयरे, घाटणे, मलिकपेठ परिसराला वादळी वाऱ्यासह आलेल्या जोरदार अवकाळी आणि मान्सूनपूर्व पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. या पावसाबरोबरच आलेल्या वादळी वाऱ्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. याची दखल घेऊन तहसीलदार सचिन मुळीक यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या पंचनाम्याचे आदेश

दिले होते. महिन्याभरापासून सुरू असलेल्या पंचनाम्याचे काम नुकतेच संपले आहे. पंचनामे करणाऱ्या तलाठ्यांनी आपला अहवाल महसूल प्रशासनाकडे सादर केला आहे. खासदार प्रणिती शिंदे आणि आमदार राजू खरे यांनी पंचनामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. त्याच बरोबर

खासदार शिंदे यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना विम्याच्या रकमा शेतकऱ्यांना तातडीने देण्याबाबत तंबी दिली होती. पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना तातडीने मिळावी, यासाठी त्यांचा अजूनही पाठपुरावा सुरू आहे.


चौकट 

बाधित शेतकरी व नुकसानीची रक्कम 

* जिराईत बाधित शेतकरी ९ क्षेत्र ५ हेक्टर, नुकसानीची रक्कम ४२ हजार ५००.

* बागायत बाधित शेतकरी ४५२ क्षेत्र ३३४ हेक्टर, नुकसानीची रक्कम ५५ लाख ८ हजार १७०.

* फळ पिके बाधित शेतकरी ९५८, क्षेत्र ५५४ हेक्टर, नुकसानीची रक्कम एक कोटी २४ लाख ८५ हजार.

Reactions

Post a Comment

0 Comments