नाराज बळीराम साठेंना 'पवारांकडून' भेटीचे निमंत्रण
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हाध्यक्षपदावरून हटवल्यानंतर नाराज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रसचे ज्येष्ठ नेते बळीरामकाका साठे यांच्याशी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी फोनवरून चर्चा केली.
तसेच त्यांना प्रत्यक्ष भेटीचे निमंत्रणही पाठवले आहे. यामुळे शरद पवार हे बळीराम साठे यांची कशी नाराजी दूर करणार? ते आपला पक्ष बदलण्याचा निर्णय मागे घेणार का? याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदावरून बळीराम साठे यांची चार दिवसांपूर्वी उचलबांगडी झाली. त्यांच्या जागी मोहिते पाटील समर्थक, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंतराव देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर जिल्हाध्यक्षपदावरून अपमानास्पद पद्धतीने हटविण्यात आल्याचे म्हणत बळीराम साठे आक्रमक झाले आहेत.
हा निर्णय परस्पर झाल्याने बळीराम साठे यांना हा निर्णय रुचला नाही. नुकताच त्यांनी वडाळा येथे कार्यकर्ता मेळावा घेऊन या निर्णयाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. विश्वासात न घेता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी परस्पर रित्या जिल्हाध्यक्ष पदावरून हटवले. नवीन नियुक्ती करतानाही कुठलीही विचारणा न करता परस्पर निर्णय घेतला.
विधानसभा निवडणुकीत मोहोळ विधानसभा मतदारसंघातून सिद्धी कदम हिला जाहीर झालेली उमेदवारी रद्द करून ती राजू खरे यांना देण्यात बळीराम साठे यांचा पुढाकार होता. मोहोळमधील एबी फॉर्म बदलल्यामुळे जयंत पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या विरोधात कटकारस्थान करून पदावरून हटविले, असा साठे यांनी दावा केला.
पक्षात होणाऱ्या नव्या बदलांबाबत विश्वासात घेऊन सांगितले असते, तर आपण पदाचा खुशीने राजीनामा दिला असता. मात्र, नवे बदल करताना कुठेही विश्वासात घेण्यात आलेले नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. अशा शब्दात साठे यांनी आजपाखड केली होती. तसेच शरद पवार यांच्यावर नाराजी व्यक्त करत पक्ष सोडण्याचाच निर्णयही त्यांनी जाहीर केला होता.
पण गेल्या दोन दिवस चाललेल्या या राजकीय घडामोडीवर शरद पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते संजय पाटील - घाटणेकर यांनी बळीराम साठे यांची भेट घेतली. त्यांचे मत जाणून घेतले आणि आज (बुधवारी) सकाळी बारामती येथे शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील राजकीय घडामोडी आणि बळीराम काका साठे यांच्या नाराजीवर चर्चा करण्यात आली.
यावेळी शरद पवार यांनी बळीराम साठे यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे म्हणत आश्वासित केले आहे. तसेच साठे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि येत्या दोन दिवसात प्रत्यक्ष भेटीसाठी या असा निरोप दिला. यामुळे शरद पवार हे बळीराम साठे यांची कशी नाराजी दूर करणार? बळीराम काका साठे हे आपला पक्ष बदलण्याचा निर्णय मागे घेणार का? याची कार्यकर्त्यांना उत्सुकता लागली आहे.
0 Comments