राज्यात पावसाचा हाहाकार! नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी
मुंबई (कटूसत्य वृत्त):- राज्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावलीये. अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले असून वाहतूकीचे तीनतेरा वाजली आहेत. ऑफिसला निघालेल्या लोकांचीही चांगलीच तारांबळ उडाली. या पावसाचा थेट परिणाम मुंबई लोकलवर पडलाय. पुण्यातील काही नद्यांनी धोक्याची पातळी देखील ओलांडली आहे. राज्यभर पाऊस पडतोय. मुळात म्हणजे यंदा राज्यात मॉन्सून लवकर दाखल झालाय. मात्र, शेतकऱ्यांनी अजून पेरणीला सुरूवात केली नाहीये. या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाल्याचेही बघायला मिळत आहे.
मुंबईतील मेट्रो 1 ची सेवा सोमवारी दुपारी ठप्प झाली होती. आझाद नगर रेल्वे स्थानकात ताडपत्री ओव्हरहेडमध्ये अडकल्याने हा तांत्रिक बिघाड झाला होता. 15 मिनिटांनी वाहतूक पूर्ववत झालीये. घाटकोपरमध्येही पाणी भरताना दिसत आहे. लांजा बसस्थानकात पाणी भरले आहे. रत्नागिरी कशेडी बोगद्यामुळे दरड कोसळली आहे. लोणावळ्यातील भूशी डॅम ओव्हरफ्लो झाला असून पर्यटकांनी गर्दी केली आहे. पुण्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. मुसळधार पावसामुळे लोणावळ्यातील भूशी डॅम 100 टक्के भरला असून ओव्हरफ्लो झालाय.
उल्हासनगर येथे 500 पेक्षा जास्त घरांचा येण्या-जाण्याचा मार्ग झाला बंद झालाय. नाल्यावरील पूल कोसळतानाची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. मुसळधार पावसामुळे नाल्यावरील पुल तुटलाय. मुसळधार पावसामुळे उल्हासनगरच्या गणेश नगर भागात नाल्यावरील पूल कोसळल्याची घटना घडलीय. या घटनेमुळे लोकांना आपल्या घराच्याबाहेर निघणे देखील शक्य होत नाही. सातत्याने पडणारा मुसळधार पाऊस यामुळे चिपळूणच्या वाशिष्ठी नदीपात्राची पातळी वाढली आहे.
पिरंगुटमधील स्मशानभूमी देखील पावसामुळे पाण्याखाली गेलीये. पूलाचा भराव रस्ता वाहून गेला. पुण्यातील मुळशी तालुक्यात रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसाने पिरंगुट परिसरात हाहाकार उडाला आहे. पुणे कोलाड महामार्गावरील तात्पुरता बांधलेला भराव रस्ता पाण्याच्या लोंढ्याने वाहून गेला आहे. अजूनही पावसाचा जोर कायम असल्याचे बघायला मिळत आहे. फक्त पाऊसच नाही तर वारेही मोठ्या प्रमाणात सुटले आहे.
छत्रपती संभाजीनगर, परभणी, पुणे , पिंपरी चिंचवड, कल्याण, ठाणे, लातूर, नांदेड आणि कोकणात सध्या पावसाच्या सरी कोसळताना दिसत आहेत. पुढील काही तासांसाठी पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. यामुळे नागरिकांनी खूप महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडणे टाळावेच. भारतीय हवामान विभागाने 24 तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट दिला होता. हवामान खात्यानुसार, विदर्भाच्या काही भागांमध्येच आता मान्सून पोहोचणे शिल्लक आहे. बाकी बहुतांश भाग मान्सूनने व्यापला आहे.
0 Comments