Hot Posts

6/recent/ticker-posts

पालखी मार्गावर यंदा अडीच कोटींचा वॉटरप्रूफ मंडप

 पालखी मार्गावर यंदा अडीच कोटींचा वॉटरप्रूफ मंडप


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आषाढी वारीनिमित्त प्रमुख दहा मानाच्या पालख्या जिल्ह्यात येतात. हवामान खात्याने यंदाच्या वर्षी जास्त पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे पालखी मार्गावर यंदा ३६ ऐवजी ४२ जलावर्धक, ११ जर्मन हँगर मंडप टाकण्यात येणार आहे. त्यासाठी दोन कोटी ४१ लाख रुपयांची तरतूद केली आहे.


सहा जुलैला आषाढी वारी आहे. वारीनिमित्त लाखो भाविक पंढरपुरात दाखल होतात. त्याअगोदर आठ दिवस मानाच्या दहा पालख्या जिल्ह्यात दाखल होतात. त्या पालख्यांबरोबर लाखो वारकरी चालत येतात. त्या वारकऱ्यांची सोय व्हावी, या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या वतीने पाच लाख स्केअर फूट वॉटरप्रूफ मंडप टाकण्यात येणार आहे.


पावसामुळे वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी ग्रामविकास खात्याने ४२ वॉटरप्रूफ मंडप टाकण्यासाठी मंजुरी दिली आहे. त्यामुळे बांधकाम विभाग दोनकडूनmटेंडर प्रक्रिया सुरू आहे. लवकरच कार्यारंभ आदेश देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.


चौकट 

हवामान खात्याने यंदाच्या वर्षी जास्त पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे पालखी मार्गावर ३६ ऐवजी ४२ वॉटरप्रूफ मंडप टाकण्यात येणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच प्रशासकीय मंजुरी देण्यात येईल.

- संदीप कोहिणकर,

अतिरिक्त सीईओ




चौकट 

तत्कालीन सीईओ यांचे उल्लेखनीय काम

गतवर्षी आषाढी वारीत जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांच्यासह इतर सर्व अधिकाऱ्यांनी वारकऱ्यांना चांगल्या सुविधा दिल्या होत्या. तशाच सुविधा यंदाच्या वर्षी द्याव्यात, अशी मागणी विश्वस्त मंडळीकडून होत आहे.

एलईडीची राहणार सोय

पालखी मार्गावर ४२ ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप टाकण्यात येणार आहे. त्या सर्व ठिकाणी एलईडी बसविण्यात येणार आहेत. या एलईडीद्वारे भजन, कीर्तन, भक्तिगीते लावण्यात येणार आहेत. तसेच वारीविषयी सर्व सोयी-सुविधांची जनजागृती एलईडीतून केली जाणार आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments